ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात वेळीच लॉकडाऊन लागू करण्यात आल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली आहे. लाखो जीव वाचले. आता आपण अनलॉक 2.0 च्या टप्प्यात प्रवेश करत आहोत. अनलॉक 1.0 मध्ये लोकांचा निष्काळजीपणा वाढला आहे. लोक नियमांचे उल्लंघन करत आहेत. पावसाळ्यात हाच निष्काळजीपणा चिंता वाढवू शकतो, त्यामुळे। नागरिकांनी सतर्क राहून स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या, अनलॉक 2.0 यासह अन्य विषयांवर मोदींनी सोशल मीडियाद्वारे जनतेशी संवाद साधला.
मोदी म्हणाले, देशात वेळीच लॉकडाऊन झाल्याने लाखो जीव वाचले.अनलॉक 2.0 मध्ये आपण प्रवेश करत आहे. जेव्हा पासून अनलॉक सुरू झाले तेव्हापासून लोकांचा निष्काळजीपणा वाढला आहे. लोक मास्क आणि सोशल डिस्टन्स पाळत नाहीत. आता पावसाळा सुरू होत आहे. अशा ऋतूत ताप, सर्दी, खोकला यासारखे आजार लगेच पसरतात. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.
गरिबांच्या जनधन खात्यात 31 हजार कोटी जमा
लॉकडाऊन काळात उद्योगधंदे बंद होते. त्यामुळे गरिबांसाठी
गरीब कल्याण योजना लागू करण्यात आली. या योजनेंतर्गत गरिबांना पावणे दोन लाख कोटींचे पॅकेज देण्यात आले. मागील
3 महिन्यात 20 कोटी गरिबांच्या जनधन खात्यात 31 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले. नोव्हेंबरपर्यंत 80 लाख लोकांना मोफत धान्य पुरवठा केला जाईल. आतापर्यंत 9 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 18 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.