जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञाचा इशारा
जिनिव्हा / वृत्तसंस्था
टाळेबंदीचे नियम शिथिल करण्यात आल्याने भारतात कोरोना संसर्गाच्या बाधितांमध्ये मोठी वाढ दिसून येऊ शकते. परंतु भारतात कोरोना महामारीसंबंधीची स्थिती अद्याप विस्फोटक नाही, पण देशात मार्चमध्ये लागू टाळेबंदी हटविण्याच्या दिशेने पावले टाकण्यात आल्याने अशाप्रकारची जोखीम कायम आहे. भारतात कोरोना बाधितांची संख्या दुप्प होण्याचा कालावधी सद्यकाळात सुमारे 3 आठवडय़ांचा असल्याचे विधान जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन सेवेचे संचालक मिशेल रियान यांनी केले आहे.
भारतात विविध भागांमध्ये महामारीचा प्रभाव वेगवेगळय़ा प्रकारचा असून शहरी तसेच ग्रामीण क्षेत्रांदरम्यान स्थितीत फरक आहे. दक्षिण आशियात भारतासह लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या बांगलादेश आणि पाकिस्तान यासारख्या देशांमध्येही महामारीने विस्फोटक स्वरुप घेतलेले नाही, परंतु असे घडण्याचा धोका मात्र कायम असल्याचे मिशेल म्हणाले.
टाळेबंदीमुळे संसर्ग मंदावला
महामारी समुदायांमध्ये पोहोचल्यावर कुठल्याही क्षणी स्वतःचा प्रकोप दाखवू शकते आणि अनेक ठिकाणी हेच दिसून आले आहे. भारतात देशव्यापी टाळेबंदीमुळे संसर्ग फैलावण्याचा वेग कमी राहिला आहे. परंतु देशात अर्थव्यवहार सुरू होताच रुग्ण वाढण्याचा धोका उद्भवला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सहाव्या क्रमांकाचा पीडित देश
कोविड-19 महामारीप्रकरणी इटलीला मागे टाकून भारत जगातील सहाव्या क्रमांकाचा सर्वात प्रभावित देश ठरला आहे. आरोग्य मंत्रालयानुसार देशातील एकूण बाधितांचा आकडा आता 2 लाख 36 हजार 657 झाली असून आतापर्यंत 6,642 जणांचा मृत्यू ओढवला आहे.
संसर्ग अत्यंत अधिक नाही
130 कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या देशात 2 लाखांहून अधिक रुग्ण सापडले आहे. परंतु एवढय़ा मोठय़ा देशासाठी ही संख्या आताही फारशी मोठी म्हणता येणार नाही. भारत एक विशाल देश असून लोकसंख्येची घनता अधिक असलेली शहरे असून काही ग्रामीण भागांमध्ये लोकसंख्या विरळ आहे. याचबरोबर विविध राज्यांमध्ये आरोग्य व्यवस्थेतही वैविध्य असल्याने कोविड-19 ला नियंत्रित करण्यात आव्हाने येत असल्याचे डब्ल्यूएचओच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले आहे.
खबरदारी बाळगावी
निर्बंध शिथिल झाल्याने लोकांनी सर्वप्रकारची खबरदारी बाळगणे करजेचे आहे. व्यापक स्तरावर वर्तनात बदल घडवून आणायचा असल्यास काही उपाययोजनांचे महत्त्व सातत्याने समजावून सांगावे लागणार असल्याचे त्या म्हणाल्या.
रुग्णालयाच्या विरोधात एफआयआर
राजधानी नवी दिल्लीत कोरोनाबाधितांची संख्या वाढण्यासह रुग्णालयांमधील बेड्ससंबंधी वाद चिघळू लागला आहे. दिल्लीच्या रुग्णालयांमधील बेड्सच्या संख्येवर दिल्ली सरकारने स्पष्टीकरण देत पुरेशा संख्येत बेड्स उपलब्ध असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी रुग्णालयांवर विरोधी पक्षांसोबत मिळून बदनामी केल्याचा आरोप केला आहे. दिल्ली सरकारने आता सर गंगाराम रुग्णालयाच्या विरोधात एफआयआर नोंदविला आहे. रुग्णालय स्वतःच्या क्षमतेनुरुप लोकांना सुविध देत नसल्याचा आणि रुग्णांना दाखल न करण्याचा तसेच बेड्सचा काळाबाजार केल्याचा आरोप आहे.