+
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाच्या दुसऱया लाटेचा संसर्ग कमी झाल्यामुळे काही राज्यांमध्ये निर्बंधांमध्ये सूट जाहीर होताच पुन्हा एकदा बाजारपेठा आणि इतर ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांबाबत लोक गांभीर्य बाळगत नसल्याची स्थिती दिसून येत असल्याने केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यांना पुन्हा एकदा सतर्क केले आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी शनिवारी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून कोरोना परिस्थितीबाबत सावधगिरी बाळगण्याचे निर्देश दिले आहे. संसर्ग कमी झाल्यास ‘अनलॉक’ प्रक्रिया राबविण्यास हरकत नाही, मात्र सावधगिरीच्या योग्य उपाययोजना पाळण्यासाठी आग्रही भूमिका घ्यावी, असे केंद्र सरकारने राज्यांना बजावले आहे.
कोरोना प्रादुर्भावाची दुसरी लाट ओसरत असताना अनलॉकची प्रक्रिया देशात सुरू झाल्याने बाजारपेठा आणि इतर सेवा देखील पुन्हा पूर्ववत होत आहेत. बाजारपेठांसह कार्यालये आणि उद्योगही सुरू झाल्यामुळे गर्दीमध्ये वाढ होऊ शकते. अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा बाळगता कामा नये, अशी सक्त सूचना गृह सचिवांनी लिहिलेल्या पत्रात राज्यांच्या सचिवांना देण्यात आल्या आहेत.
कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने स्थानिक पातळीवर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी अनलॉक संदर्भातील निर्णय घेतले आहेत. पण निर्बंध पुन्हा लादावेत की नको याचा संपूर्णपणे निर्णय स्थानिक परिस्थिती पाहून घ्यावा, असेही नमूद करण्यात आले आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन होईल याची जबाबदारी सुयोग्य पद्धतीने हाताळली पाहिजे. यासोबतच चाचण्या, टेसिंग आणि उपचार या सरकारच्या रणनितीवर भर देण्याचा सल्ला केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे.
कोरोना प्रतिबंधक प्रोटोकॉल पाळण्याची सूचना
कोविड प्रोटोकॉल अंतर्गत मास्कचे बंधन, हाताची स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंग आणि बंद ठिकाणी सुयोग्य वेंटिलेशन असणे बंधनकारक आहे. कोरोनाच्या तिसऱया लाटेची शक्मयता वर्तविण्यात असताना या गोष्टींचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्याआधी संबंधित राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी संपूर्ण प्रक्रिया सतर्क राहूनच सुरू करावी, असेही सांगण्यात आले आहे.