मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली आज बेंगळुरात बैठक
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि मृत्यूचा दर कमी होत असल्याने 5 जूनपासून लॉकडाऊन आणखी शिथिल केला जाणार असून अनलॉक 3.0 जारी करण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी वेळेत वाढ, नाईट कर्फ्यूच्या कालावधीत कपात होण्याची शक्यता आहे. शनिवारी बेंगळूरमध्ये मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखाली होणाऱया बैठकीत तिसऱया टप्प्यातील अनलॉकचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
दुसऱया टप्प्यातील अनलॉकचा अवधी 5 जुलै रोजी सकाळी 6 वाजता संपणार आहे. त्यामुळे तिसऱया टप्प्यातील अनलॉकबाबत येडियुराप्पा शनिवारी मंत्री आणि अधिकाऱयांची बैठक घेऊन चर्चा करतील. यावेळी आणखी कोणकोणत्या क्षेत्रांना सूट द्यावी, याबाबतचा निर्णयही घेतला जाणार आहे. राज्यातील म्हैसूर, कोडगू, मंगळूर हे जिल्हे वगळता उर्वरित जिल्हय़ांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे कोविड तांत्रिक सल्लागार समितीच्या शिफारसींनुसार अनलॉक 3.0 चा निर्णय घेतला जाणार आहे.
लॉकडाऊनमुळे बंद असणारे मॉल, चित्रपटगृहे, पब, क्लब, 50 टक्के ग्राहकांच्या क्षमतेने सुरू करण्यास मुभा दिली जाण्याची शक्यता आहे. सध्या बारमध्ये केवळ मद्य पार्सल स्वरुपात नेण्याची मुभा आहे. आता सोमवारपासून बार-रेस्टॉरंटमध्ये टेबल सर्व्हिसला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.
खरेदीसाठी सकाळी 7 ते रात्री 7 पर्यंत वेळ?
आवश्यक वस्तू खरेदीसाठी सध्या सकाळी 6 ते सायंकाळी 5 पर्यंत वेळ आहे. आता ही वेळ वाढवून देण्यात येण्याची शक्यता आहे. जर वेळ वाढवून दिली तर रात्री 7 पर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी मिळू शकेल. त्याचप्रमाणे दररोजचा नाईट कर्फ्यू रात्री 8 पासून दुसऱया दिवशी सकाळी 5 पर्यंत होऊ शकेल. सध्या नाईट कर्फ्यू रात्री 7 ते सकाळी 6 पर्यंत आहे. तर विकेंड कर्फ्यू सध्या आहे त्याच स्थितीत ठेवण्यात येण्याची शक्यता आहे.