लावलेले वृक्ष जगवण्यासाठी धडपड, अनारी ग्रामस्थांच्या उपक्रमाचे कौतुक
चिपळूण
चिपळूण तालुक्यातील अनारीचे ग्रामस्थ व केदारनाथ तरुण विकास मंडळाने वृक्ष संवर्धनाची चळवळ गेल्या तीन वर्षांपासून हाती घेतली आहे. विशेष म्हणजे केवळ वृक्ष लागवड करून आपले काम संपले असे म्हणणाऱयांची संख्या वाढत असताना या मंडळाने मात्र लावलेल्या वृक्षांची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली आहे. यासाठी मानधनावर एका व्यक्तीची निवड करताना एक वेगळा आदर्श पंचक्रोशीत घालून दिला आहे.
तीन वर्षांपूर्वी गावच्या बैठकीदरम्यान वृक्ष लागवड व संवर्धनाची संकल्पना ग्रामस्थ तसेच मुंबई मंडळाने पुढे आणली. अनेकांनी यासाठी पुढाकार घेतल्यानंतर वृक्ष लागवड नियोजनबध्द व्हावी यासाठी जेसीबीच्या सहाय्याने जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले. गावानेच पुढाकार घेतल्यामुळे पहिल्याच वर्षी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम मोठय़ा स्वरुपात घेण्यात आला. पहिल्याच वर्षी गाव परिसरात सुमारे एक हजार आंबा, काजू, नारळ, साग यासारख्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
वृक्ष लागवडीनंतर त्या वृक्षांच्या देखभाल व संवर्धनाकडे लक्ष न देणे आता सगळय़ांच्याच अंगवळणी पडले आहे. यामुळे काही वर्षांपूर्वी झाडांबरोबर काढलेले ‘सेल्फी’ही डिलीट झाले आणि झाडेही मरून गेली. मात्र अनारी गाव याला अपवाद ठरले आहे. अनारी ग्रामस्थांनी वृक्ष लागवड केल्यानंतर वृक्ष संवर्धनाची चळवळ हाती घेतली. यासाठी एका व्यक्तीची मानधन तत्वावर नेमणूक करण्यात आली. त्याचा मानधनाचा खर्च मुंबई मंडळाने उचलला आहे. दुसऱया वर्षीही वृक्ष लागवड व संवर्धनाचा उपक्रम मोठय़ा स्वरुपात राबवण्यात येऊन पाचशे वृक्षांची लागवड करण्यात आली होती.
पावसाळा सुरु होताच ग्रामस्थ एकत्र येऊन लागवड केलेल्या वृक्षाच्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवतात. वृक्षांना खतही घातले जाते. यामुळे तीन व दोन वर्षापूर्वी लागवड केलेल्या वृक्षांची आता चांगली वाढ झाली आहे. यावर्षीही या उपक्रमात खंड पडला नाही. कोरोनामुळे हा उपक्रम साधेपणात घेण्यात आला. यावर्षी 200 वृक्षांची लागवड करण्यात करण्यात आली.
यावेळी कैसर देसाई, ग्रामसुधार समिती अध्यक्ष कृष्णा पवार, उपसरंपच सदानंद पवार, विजय कदम, गणेश पवार, विनाद पवार, जयराम सावंत, सीताराम कदम, पांडुरंग कदम, आनंद पवार, विजय पवार, भरत पवार, योगेश तावडे आदी उपस्थित होते.