दूरसंचार विभागाकडून प्रस्ताव – प्रमाणापेक्षा अधिकच्या कॉलवर येणार मर्यादा
वृत्तसंस्था/ मुंबई
ग्राहकांना विविध स्वरुपाची माहिती देण्यासाठी अनावश्यक कॉल्स आणि एसएमएस सतत येत असतात. यामुळे ग्राहकांना मनस्ताप होत असल्याचे दिसून येते. यावर मार्ग काढण्यासाठी दूरसंचार विभागाकडून (डीओटी) एक प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याची माहिती आहे. याअंतर्गत संबंधीतांवर दंड आकारणी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
यामध्ये दूरसंचार कंपन्या ग्राहक वाढविण्यासाठी मोबाईल वापरकर्त्यांना प्रमाणापेक्षा अधिकचे कॉल व एसएमएस करु शकणार नाहीत. असे केल्यास संबंधीत कंपनीला दंड आकारणी केली जाणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे 50 पेक्षा अधिकचे फोन कॉल आणि एसएमएसवर 10 हजार रुपयांपर्यंत दंड आकारणी होणार असल्याचे संकेत आहेत. हा दंडाचा आकडा वाढवण्यासोबत कडक नियमाची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरु आहे. नवीन परिपत्रकाप्रमाणे शून्य ते 10 कॉलच्या दरम्यान अनावश्यक कॉल्ससाठी एक हजार रुपये, 11 ते 50 कॉल्ससाठी प्रति उल्लंघन पाच हजार रुपये आणि 50 हजारपेक्षा अधिकच्या नियमांचे उल्लंघन करणाऱयावर प्रति उल्लंघन 10 हजारचा दंड होणार असल्याचा प्रस्ताव आहे.
कॉल-एसएमएसची होणार पडताळणी
फोनवर कॉल्स आणि एसएमएसच्या उल्लंघनाची पडताळणी दूरसंचार विभागाचे डिजिटल युनिट करणार आहे. टेलिकॉम कमर्शिअल कम्युनिकेशन कस्टमर प्रेफरन्स रेग्युलेशन 2018 च्या अंतर्गत दंड आकारणी ही शून्यापासून 100 व 100 ते 1000 आणि 1000 ते 10,000 अशी राहणार असल्याची माहिती आहे.