ग्लोब थिएटरनजीक बॅरिकेड्स लावल्याने वाहनधारकांची गैरसोय : वळसा घालून यावे लागत असल्याने भुर्दंड
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावले जातात. पण काही ठिकाणी रहदारी पोलीस आपल्या सोयीसाठी बॅरिकेड्स लावून वाहतूक वळवीत असल्याचे निदर्शनास आले आहे. ग्लोब थिएटरजवळील चौकात अंबा भुवनकडून येणाऱया रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्यात आल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे.
बॅरिकेड्सच्या अनावश्यक वापरामुळे वाहनधारकांच्या समस्येत भर पडत आहे. सध्या पेट्रोलचा दर 105 रुपये झाला आहे. अशातच बॅरिकेड्समुळे वळसा घालून जावे लागत असल्याने वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागत आहे. रहदारी पोलिसांवर कामाचा ताण वाढत असल्याने ठिकठिकाणी चौकांमध्ये बॅरिकेड्स लावून वाहतूक वळविण्याचा प्रकार सुरू आहे.
पहिले रेल्वेगेटनजीक बॅरिकेड्स
पहिले रेल्वेगेट येथे रहदारी नियंत्रणासाठी सिग्नल व्यवस्था तसेच रहदारी पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती. पण येथील ट्रफिक सिग्नल बंद ठेवून संपूर्ण रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे बेळगावकडून मंडोळी रोडला जाणाऱया वाहनधारकांना पहिल्या रेल्वेगेटजवळून वळसा घेता येत नाही. त्यामुळे त्या वाहनधारकांना पुढे जावून परत यावे लागते. परिणामी अर्धा किलो मीटरचे अंतर वाढते. दररोज मंडोळी रोडमार्गे जाणाऱया वाहनधारकांची संख्या मोठय़ा प्रमाणात असून प्रत्येक वाहनधारकाला इंधन खर्चाचा भुर्दंड बसत आहे.
तसेच बीएसएनएल कार्यालयाशेजारी खानापूर रोडवर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे टिळकवाडीकडून बाजारपेठेत जाणाऱया वाहनधारकांना अंबा भुवनकडे जाता येत नाही.
वाहनधारकांना ये-जा करणे मुश्कील
ग्लोब थिएटरजवळील चौकामधून वळसा घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. परिणामी वाहनधारकांना फिश मार्केटसमोरच्या रस्त्याने वळसा घेऊन जावे लागते. ग्लोब थिएटरसमोरील चौकात अंबा भुवनकडून येणाऱया रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्याचा प्रकार सुरू आहे. सकाळी या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात येत असल्याने वाहनधारकांना ये-जा करणे मुश्कील बनले आहे. हा रस्ता बंद ठेवण्यात येत असल्याने कॅम्पमध्ये जाणाऱया वाहनधारकांना गोगटे सर्कल चौकात वळसा घालून यावे लागत आहे.
ग्लोब थिएटरजवळील ट्रफिक सिग्नल सुरू करा
ग्लोब थिएटरजवळ ट्रफिक सिग्नल बसविण्यात आला आहे. पण हा सिग्नल बंद ठेवण्यात येत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. येथील ट्रफिक सिग्नल सुरू करून अंबा भुवनकडून येणारा रस्ता सर्व वाहनधारकांसाठी खुला ठेवावा, अशी मागणी होत आहे. बॅरिकेड्सचा वापर वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आहे. पण हेच बॅरिकेड्स अनावश्यक ठिकाणी लावण्यात येत असल्याने वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे एकंदर वाहनधारकांची गैरसोय होत आहे.