भारतातील प्रतिष्ठीत अशा टाटा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनाने देशाला धक्का बसला आहे. आपल्या उमद्या व्यक्तिमत्त्वाची त्यांनी भारतीय उद्योग विश्वाला भुरळ पाडली. आयुष्यात एका मोठय़ा पदापर्यंत झेप घेतली आणि तेथून एका प्रवासात त्यांचे अपघाती निधन झाले हे पटायला आणि पचवायला अवघड आहे. मात्र ते सत्य असल्याने त्याचा स्वीकार करणे भाग आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कंपनीने भारतात अनेक विक्रम प्रस्थापित केले. सर्वात उंच रहिवासी इमारत, सर्वात लांब रेल्वे पूल आणि सर्वात मोठय़ा बंदराचं बांधकाम केले, अशा एका प्रभावी व्यक्तिमत्त्वाची अशी अखेर होणे चर्चेचा विषय बनली आहे. अत्यंत महागडय़ा अशा आणि सर्व प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी सुविधा असणाऱया वाहनात मागे बसलेल्या व्यक्तीचा मृत्यू होतो या गोष्टीबद्दलही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हा अपघात झाला कसा असावा, याची काही संभाव्य दृश्ये कृत्रिमरित्या तयार करून लोकांना ते समजावे या पद्धतीने प्रसारित केली जात आहेत. ज्यामध्ये गतीने चाललेल्या वाहनाचा अपघात झाल्यानंतर मागच्या आसनवरील व्यक्ती ताकदीने पुढे कसा फेकला जातो इथपासून ते मागच्या आसनावर असूनही सीट बेल्ट बांधली नसेल तर जीव रक्षक एअर बॅग खुलत नाहीत आणि त्यामुळे मृत्यू होऊ शकतो इथपर्यंतची अद्ययावत माहिती दिली जात आहे. अहमदाबाद मुंबई महामार्गाचा पालघर जवळ लोप पावून रस्ता छोटा कसा होतो आणि पुलावर तो कसा धोकादायक बनतो याचीही माहिती विविध वृत्तपत्रांकडून दिली गेली आहे. काही वृत्तपत्रांनी हा मार्ग कसा धोकादायक बनला आहे याबाबत आधीच केलेल्या वार्तांकनाची माहिती दिली असून, त्याकडे झालेल्या दुर्लक्षातून एक मोठा उद्योगपती गमावण्याची वेळ आल्याची खंत व्यक्त केली आहे. मिस्त्री यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करताना ही भारतीय उद्योग विश्वाची मोठी हानी असल्याचे म्हटले आहे. भारताच्या आर्थिक शक्तीवर विश्वास असणाऱया अशा व्यक्तिमत्त्वाच्या निधनाने आपणास स्तंभित केले असेही त्यांनी म्हटले आहे. मिस्त्री कुटुंबीयांचे निकटवर्ती, ज्ये÷ नेते शरद पवार यांनी यानिमित्ताने मिस्त्री यांच्या कार्याचा आलेखच लोकांसमोर मांडला आहे. ते म्हणतात, महाराष्ट्रात किंवा देशात काही पारशी कुटुंबे अशी होती, जी प्रसिद्धीपासून बाजूला राहून विविध क्षेत्रात देशाच्या विकासामध्ये योगदान देत होती. त्यांच्यामध्ये प्रसिद्ध नसलेले पण अत्यंत महत्त्वाचे कुटुंब म्हणजे शापूरजी पालनजी मिस्त्री. शापूरजी यांनी महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या औद्योगिकीकरणामध्ये, विविध प्रकल्पांमध्ये अत्यंत मोलाचे योगदान दिले. एक काळ असा होता की, टाटा ग्रुपमध्ये टाटांच्यापेक्षा शापूरजी पालनजी ग्रुपची अधिक भांडवली गुंतवणूक होती. नंतरच्या काळामध्ये टाटांची गुंतवणूक वाढली. शापूरजी पालनजी मिस्त्री यांच्यानंतरची पिढी म्हणजे सायरस मिस्त्री. ते अनेक वर्ष टाटाच्या बोर्डावर होते. मध्यंतरी रतन टाटा यांनी जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतर टाटाचे प्रमुखपद सायरस मिस्त्री यांच्याकडे आले. सायरस हे अधिक कष्ट करणारे, व्यवसायामध्ये अत्यंत बारकाईने लक्ष देणारे होते. त्यांना टाटाचे नेतृत्व करण्याचा थोडा काळ मिळाला. या काळात सुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची कामगिरी केली. दुर्दैवाने त्यांच्या सहकाऱयांमध्ये एकवाक्मयता राहिली नाही, त्यामुळे त्यांना ते पद सोडावे लागले. त्यांचा अपघात हा प्रचंड धक्कादायक आहे. असे काही घडेल यावर विश्वासच बसत नाही. गेल्या काही वर्षामध्ये एकापाठोपाठ एक आघात या कुटुंबावर आले. टाटाचे नेतृत्व सोडावे लागले, कुटुंबातील काही व्यक्ती गेल्या, काहींना गंभीर आजारांना तोंड द्यावे लागले आणि आता सायरस मिस्त्रींचा हा अपघात. पण, या देशातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प, जसे रस्ते, उद्योग, धरणे असे अनेक प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात शापूरजी पालनजी कुटुंबाचे मोठे योगदान आहे. देशाच्या उभारणीसाठी त्यांचे मोठे योगदान आहे आणि या कुटुंबातील नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे सायरस मिस्त्री आज आपल्यात नाहीत, हे देशाच्या दृष्टीने धक्कादायक असे वृत्त आहे. हीच भावना देशभरातील राजकीय आणि उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे. टाटा कुटुंबीयांव्यतिरिक्त त्या समूहाच्या अध्यक्षपदी नियुक्त होणारे ते केवळ दुसरे होते. काही तोटय़ातील व्यवसाय चालवायचे नाहीत असा ठाम निर्णय त्यांनी घेतला ज्यावरून त्यांच्यात आणि रतन टाटांच्यात वादाचे निमित्त झाले आणि त्याचा शेवट त्यांच्या पदावनतीत झाला. पुढे त्यांना संचालक पदावरूनही दूर व्हावे लागले. मिस्त्री यांनी आपल्यावरील कारवाई कंपनी कायद्यात न बसणारी आहे असा दावा न्यायालयात केला मात्र त्याचा टिकाव लागला नाही. काही बाबतीत मात्र त्यांच्या बाजूनेही न्यायालयांनी काही निकाल दिले. ज्या आकस्मिकपणे देशातील सर्वसामान्य माणसाला त्यांची ओळख झाली होती तितक्मयाच आकस्मिकरीतीने त्यांची अखेरही झाली आहे. पण ही अखेर नैसर्गिक नाही हे दुर्दैव. याचा धक्का जगातील उद्योग समूहांनाही बसणार आहे. एक मोठा उद्योगपती एका अपघातात सहजपणे आपले प्राण गमावतो या गोष्टीबद्दल आश्चर्य आणि संशयही व्यक्त केला जाणार आहे. हा संशय चुकीचा असेल मात्र तरीही अशा चर्चांना रोखण्यासाठी अपघाताची वस्तुनि÷ माहिती जाहीर करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र सरकारने तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. त्या चौकशीचा अहवाल लवकरात लवकर जाहीर होणे आवश्यक आहे. मुंबईत प्रवेश करणाऱया दोन मार्गावरील विनायक मेटे आणि सायरस मिस्त्री यांचे अपघात राज्याला आणि देशाला आपल्या वाहतूक व्यवस्थेबाबत विचार करायला लावणारे आहेत. महत्वपूर्ण मार्गावर होणारे दुर्लक्ष आणि शेकडो माणसे जिथे जीव गमावतात अशा दुर्घटना स्थळांबाबत काय करायचे याबाबत त्या त्या जिह्यातील अधिकारी आणि शासकीय समित्यांची अनास्था किती गंभीर आहे ते या निमित्ताने उघड झाले आहे. अशा बाबतीत दुर्लक्ष, अनास्था दिसत असेल तर कठोर कारवाईही आवश्यक आहे. सायरस मिस्त्री यांच्या रूपाने एक उमदे व्यक्तिमत्व एका अनावश्यक अपघातात भारताने गमावले आहे. ही अनास्थेमुळेच मोजावी लागलेली फार मोठी किंमत आहे.
Previous Articleखंडाळा कारखान्याच्या उभारणीतच गफला
Next Article चिनी खेळण्यांना मात देणाऱया कोंडापल्ली
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.