महामुनी शुकदेव परिक्षिती राजाला बाणासुराची कथा सांगताना पुढे म्हणतात –
चित्रलेखेने अनिरुद्धावर टाकलेली आपली तामसी विद्या मोहिनी काढून घेतली व उषेचा निरोप घेतला. उषेच्या शयनकक्षातून बाहेर जाताना दार लावून घ्यायला ती विसरली नाही. चित्रलेखा बाहेर गेल्यावर उषा अजून निदेत असलेल्या अनिरुद्धापाशी आली. तिने हळूच पुन्हा त्याच्या मुखावरील पदर दूर केला व प्रेमाने पुन्हा त्याचे आकर्षक रूप पाहिले. तिने आपल्या दोन्ही नेत्रांनी त्याचे निंबलोण उतरले. त्याचे ते रसरशीत नवयौवन लावण्य पाहून अत्यंत आनंदभरीत अंतःकरणाने ती आपल्या मनाशी म्हणाली – या त्रिजगतात मी धन्य आहे. भवानी मातेच्या कृपेनेच असा प्रियतम वर मला लाभला. तेवढय़ात पहाट झाली. झेंगटाच्या गजराने सूर्यनारायणाच्या आगमनाची वर्दी दिली. भैरव बिभास या पहाटेच्या रागांचे सूर गंधर्व आळवू लागले. वेदपाठशाळांमधून वेद मंत्रांच्या अध्ययनाची आवर्तने तेथील विद्यार्थी करू लागले. त्याचा मंगल ध्वनी आसमंतात घुमू लागला. असा प्रभात गजर होताच अनिरुद्धाला हळूहळू जाग आली. जाग येताच तो चमत्कारून आजुबाजूला पाहू लागला. ही जागा कोणती? हा महाल, हे शयनगृह कुणाचे? मी इथे कसा? मला द्वारकेत येऊन भेटलेली ती चित्रलेखा कुठे गेली? तेवढय़ात त्याचे लक्ष लाजून खाली मान घालून बसलेल्या उषेकडे गेले. त्याला तात्काळ आठवले की आपल्या स्वप्नात जी आली होती व जिच्याशी आपण रतिक्रीडा केली होती ती नवयौवना रुपवती हीच! तो पुन्हा विचार करू लागला, हे स्वप्न तर नव्हे?
नोहे आपुलें निद्रागार । भासे विचित्र रत्नमंदिर ।
स्वप्न किंवा हा जागर । करी विचार हृत्कमळीं ।
मुखें करूनि नामस्मरण । पुढती घेऊनियां प्रावरण ।
मंचकीं निवान्त केलें शयन । येरी उद्विग्न हृत्कमळीं ।शिकवूनि गेली चित्रलेखा । ते शिकवण स्मरूनि उषा । सवेग वळघूनिया मंचका । करी शुश्रूषा चरणांची ।म्हणे सरली सर्व शर्वरी । प्राची रंगली भास्करकरिं । निद्रा कायसी ये अवसरिं । आन्हिकाचारिं प्रवर्तिजे ।
कनककलशीं उष्ण पाणी । गंडूषपात्र ठेविलें धरणी ।
उठोनि बैसा मंचकासनीं । चरण क्षाळीन नावेक ।
क्रमुकाङ्गार वज्रज्योती । शिवा स्फटिका मरीचि निगुती । चूर्ण घर्षण करूनि दंतीं । मुख क्षाळीजे स्वामिया ।इत्यादिवचनीं प्रबोधी उषा । तंव ते पातली चित्रलेखा । म्हणे स्वामिया उघडूनि मुखा । सादर विलोका भुवनातें ।
ऐकूनि चित्रलेखेचें वचन । अनिरुद्ध पाहे उघडूनि नयन । म्हणे रात्री केलें शयन । तें मम सदन हें नोहे ।शयनकाळीं त्वा वार्ता कथिली । त्यावरी निद्रा मज लागली । जागृत होतां इये काळीं । अपर वेल्हाळी हे कोण ।येरी म्हणे जे कथिली उषा । स्वप्नामाजी नराधीशा ।
तुम्हीं अनुभविली डोळसा ।
ते हे राजसा बाणसुता ।
तुम्हांवेगळा न वरिं कोण ।
ऐसा उषेचा दृढ निर्धार ।
तुमच्या विरहें निज शरीर ।
झाली तत्पर त्यजावया ।
सुविचार भगवंताचे अखंड स्मरण या नाव भजन
Ad. देवदत्त परुळेकर