ऑनलाईन टीम / मुंबई :
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या एफआयआरशी संबंधित सर्व कागदपत्रे सीबीआयकडे सोपवण्यास तयार असल्याचे महाराष्ट्र सरकारने आज मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले आहे. तसेच रश्मी शुक्ला यांनी बनवलेला अहवालही 31 ऑगस्टपर्यंत सीबीआयकडे सोपवू, असे राज्य सरकारने उच्च न्यायालयाला सांगितले आहे. यावर पुढील सुनावणी दोन सप्टेंबर रोजी होणार आहे.
पोलीस बदल्यांमधील कथित भ्रष्टाचार प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी तयार केलेला गोपनीय अहवालही महाराष्ट्र सरकार सीबीआयला देणार आहे. अनिल देशमुख प्रकरणात सीबीआयकडून सुरु असलेल्या तपासाशी संबंधित असल्याने हा अहवाल सीबीआयला सोपवण्यात येईल.
दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात तपासासाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करुन देण्याचे राज्य सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणी सीबीआयने उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेत केली होती. अनिल देशमुख प्रकरणातील कागदपत्र मागण्यासाठी गेलेल्या अधिकाऱयाला एसीपी दर्जाच्या अधिकाऱयाने धमकावले. त्यामुळे सीबीआयने हायकोर्टात तक्रार केली होती.