ऑनलाईन टीम/तरुण भारत
भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्षांच्या नेत्यांवर करावाया करत असल्याची वारंवार टीका केली जात आहे. विशेषत: महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या बिगर भाजपा सरकारमधील नेते आणि मंत्र्यांवर ईडी-सीबीआयकडून धाडी टाकल्या जात आहेत. महाराष्ट्रात ईडीने नेत्यांना अटकही केली आहे. यामध्ये अनिल देशमुखांना ईडीने अटक केल्यांनतर त्यांचा राजीनामा घेतला होता. आत नवाब मालिकांना ईडीकडून अटक झाल्यांनतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपाकडून करण्यात येत आहे. यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, ईडीने अटक केल्यानंतर अनिल देशमुखांप्रमाणेच नवाब मलिक यांचा देखील राजीनामा घेण्याची मागणी भाजपाकडून केली जात असताना संजय राऊतांनी त्यावर खोचक शब्दांत भूमिका मांडली आहे. “आम्ही राजीनामा का घ्यावा? तुम्ही चुकीच्या आरोपांवर आमच्या मंत्र्यांना फसवत आहात. अनिल देशमुखांचा राजीनामा घेणं ही चूक होती. जो निर्णय घ्यायला नको होता. तो निर्णय घाईघाईनं झाला असं मला वाटतं. त्यांच्याबाबत काय पुरावे आहेत हे आम्ही पाहिलं आहे. ज्या कारणासाठी केंद्रीय तपास यंत्रणांनी त्यांच्यावर धाडी घातल्या, तेही आम्ही पाहिलं आहे”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.