मुंबई / ऑनलाईन टीम
अनिल देशमुख यांनी सोमवारी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर भाजप नेते गिरीश महाजन यांनी ठाकरे सरकारवर सोशल मीडियाच्या माध्यमातून निसाणा साधला आहे. देशमुख यांचा राजीनामा ही तर अजून सुरूवात आहे पुढे अजून बरेच गैरव्यवहारांची प्रकरणे येणार. आगे आगे देखो… होता है क्या?, असे सूचक ट्विट गिरीश महाजन यांनी केले आहे. गिरीश महाजन यांनी एकामागून एक ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
गिरीश महाजन यांनी पहिल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, राज्यातील वसुलीबाज ठाकरे सरकारमधील मंत्री अनिल देशमुख यांना हायकोर्टाच्या दणक्याने राजीनामा द्यावा लागला आहे. ही तर अजून सुरूवात असून पुढे अजून बरेच गैरव्यवहारांची प्रकरणे येणार. आगे आगे देखो…होता है क्या?.
तसेत पुढच्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, उच्च न्यायालयाने १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश दिल्यामुळे सरकारची नाचक्की होऊन देशमुख यांना राजीनामा द्यावाच लागला आहे. कोरोनाचे संकट असून देखील राज्यातील ह्या सरकारला जनतेचे काही देणेघेणे नाहीये, हे फक्त वसुली सरकार आहे.
तिसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, एका एपीआयला १०० कोटींचे टार्गेट देणारे हे खंडणीबाजांचे सरकार आहे. खरं तर हा आरोप झाल्यानंतर अनिल देशमुख यांनी नैतिकता दाखवून राजीनामा देण्याची गरज होती. भाजपाच्या वतीने माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह आम्ही सर्वांनी ही मागणी केली होती.
गिरीश महाजन यांनी आपल्या चौथ्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मात्र निगरगट्ठ ठाकरे सरकारने त्यांची पाठराखण केल्याने अनिल देशमुखांना अभय मिळाले होते. अनिल देशमुख यांचा राजीनामा हा प्रचंड नाचक्की झाल्यानंतरचा आणि कोर्टाच्या निर्देशानंतरचा आहे. यामुळे राज्य सरकारच्या गैरकारभाराचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले आहे.
शेवटच्या ट्विटमध्ये गिरीश महाजन यांनी अजून बऱ्याच गोष्टी समोर येतील असा दावा केला आहे. मात्र जे काही समोर आलेय ते फक्त हिमनगाच्या टोकाप्रमाणे आहे. अजून बरेच काही समोर येणार आहे. या सरकारने अनेक क्षेत्रांमध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून आता हा पापांचा घडा भरत चालला आहे. अनिल देशमुखांचा राजीनामा ही तर फक्त सुरूवात आहे, असे त्यांनी म्हटले आहे.