नवी दिल्ली / ऑनलाईन टीम
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या आव्हान याचिकेवरील सुनावणीला सुरूवात झाली आहे. सुप्रिम कोर्टात नेमकं काय होतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयची चौकशी करण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. या निर्णयाच्या विरोधात अनिल देशमुख यांनी व्यक्तिगत स्तरावर सुप्रीम कोर्टात आव्हान याचिका दाखल केली आहे. परमवीर सिंग यांच्या लेटर बॉम्ब प्रकरणी महाराष्ट्र सरकारने देखील सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या दोन्ही याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई हाय कोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतरच अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. नैतिकतेच्या मुद्द्यावर आपण राजीनामा देत असल्याचं त्यावेळी देशमुख यांनी सांगितलं होतं.