नवी दिल्ली / ऑनलाईन टीम
मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावरुन भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी भाजपकडून होत आहे. शरद पवार यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत याविषयी भूमिका स्पष्ट केली.
शरद पवार म्हणाले की, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून मागणी होत आहे. पण त्याबाबतचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत. मुख्यमंत्रीच याबाबतचा निर्णय घेतील असं शरद पवार यांनी आज जाहीर केलं. गृहमंत्र्यांवरील आरोप गंभीर आहेत. परमबीर सिंग यांनी 100 कोटीच्या वसुलीचा आरोप केलाय. पण त्याबाबत पैसा कसा गोळा केला जातो याची माहिती त्यांनी दिलेली नाही. दरम्यान, देशमुखांची बाजूही आम्ही जाणून घेऊ. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पवार यांनी दिली.
थेट गृहमंत्र्यांवर आरोप होत असल्यामुळे सरकारवर त्याचा काही परिणाम होईल का? असा सवाल पत्रकारांनी विचारला. त्यावेळी महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र पोलिसांच्या प्रतिमेवरही त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. यासोबतच परमबीर सिंग यांनी मुंबई पोलीस आयुक्त पदावर असताना आरोप का केला नाही? असा प्रश्नही पवारांनी यावेळी विचारला.
देशमुख उद्या मुंबईत येतील. त्यांची बाजू ऐकून घेतली जाईल. तसंच अन्य नेत्यांशी बोलून देशमुखांबाबतचा निर्णय दोन दिवसात घेण्यात येईल, असे शरद पवार यांनी जाहीर केले आहे.