मुंबई \ ऑनलाईन टीम
राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना १०० कोटी वसुली प्रकरणी सीबीआयच्या प्राथमिक तपासातून क्लिनचिट मिळाल्याची माहिती समोर येत आहे. महिन्याला १०० कोटी रुपये वसुलीचे आरोप देशमुख यांच्यांवर होते. या प्रकरणामुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. सीबीआयने याप्रकरणात ६५ पानांचा अहवाल सादर केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या देशमुखांना आता मोठी दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. या अहवालाची पीडीएफ फाईल सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने उलट सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र या अहवालाच्या विश्वासार्हतेबद्दल अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. या प्रकरणी अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी भाष्य केलं आहे.
या प्रकरणावर एका वृत्तवाहिनीवर बोलताना नवाब मलिक म्हणाले की, देशामध्ये फेकन्यूज हे व्हायरस सारखे पसरत असल्याचे न्या. चंद्रचूड यांनी सांगितले आहे. सत्य समोर आणण्याची जनतेची, माध्यमांची आणि जे सत्तेत आहेत त्यांची जबाबदारी आहे. हा अहवाल खरा की खोटा हे सीबीआयसोडून कुणीही सांगू शकत नाही. सीबीआयने याबाबतील खुलासा करायला हवा,असे नवाब मलिक यांनी यावेळी स्पष्ट केले.
ही कागदपत्रे सीबीआयच्या रेकॉर्डचा भाग आहे की नाही याचा खुलासा सीबीआय करु शकते. जर खोटं असेल तर याची चौकशी करुन त्याच्यावर कारवाई होऊ शकते. जर हे खरं असेल तर सीबीआयने हे सांगितलं पाहिजे,” असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.