ऑनलाईन टीम / मुंबई :
मनी लाँड्रिंग प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज मुंबईतील विशेष न्यायालयने फेटाळला. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
100 कोटी रुपये वसुलीच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने 29 डिसेंबर 2021 रोजी अनिल देशमुख आणि त्यांच्या दोन मुलांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली होती, तेव्हापासून ते तुरुंगातच आहेत. या प्रकरणी अनिल देशमुख यांनी सेशन कोर्टात नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर आज सुनावणी झाली. न्यायालयाने देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती.