सांगली / प्रतिनिधी
अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्याचा पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिली.
अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्यांच्याकडे गृहमंत्रीपद सोपवतील, तो निर्णय महाविकास आघाडीमधील तीनही पक्ष मान्य करतील असेही पाटील यांनी सांगितले. चौकशीमध्ये अडथळा नको, या हेतूने शरद पवार यांना सांगून अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला. पण गृहमंत्री पदाच्या संधीबद्दल बोलताना मात्र जयंत पाटील यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार घेतील तो निर्णय आपल्याला मान्य असेल, असे सांगितले.