ऑनलाईन टीम / नागपूर :
शंभर कोटी रुपये वसुलीच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख लवकरच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात परततील, असा विश्वास राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे.
मिटकरी आज नागपूर दौऱ्यावर आहेत. अनिल देशमुख यांच्या मतदारसंघात मिटकरी यांच्या हस्ते काही विकासकामांचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. मिटकरी म्हणाले, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. त्यामुळे देशमुख हे न्यायालयीन कोठडीत आहेत. पण मुळातच परमबिर सिंह भ्रष्टाचारी माणूस आहे. यांच्या आरोपाने काहीही सिद्ध होणार नाही. देशमुख यांच्या विरोधात भाजपने कटकारस्थान केले आहे, हे समोर आले आहे. कारण सचिन वाझे रोज रंग बदलत आहे.
त्यामुळे अनिल देशमुख यांच्याविरोधातील आरोप सिद्ध होणार नाहीत. लवकरच देशमुख महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात परत येतील आणि शरद पवार त्यांना पुन्हा गृहमंत्रिपद देतील असा विश्वास असल्याचेही मिटकरी म्हणाले.