ऑनलाईन टीम / मुंबई :
माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांची ईडीने जप्त केलेली सर्व संपत्ती परत करावी, असे आदेश सुप्रीम कोर्टाने ईडीला दिले आहेत. राष्ट्रवादीच्या फायरब्रॅन्ड नेत्या रुपाली पाटील यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
रुपाली पाटील यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, ”सुप्रीम कोर्टाचा ईडीला दणका….माजी ग्रहमंत्री अनिल देशमुख यांची व कुटुंबाची ईडीने जप्त केलेली सर्व संपत्ती अनिल देशमुख यांना परत करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. कायद्यापुढे कोणी मोठा नाही. जय संविधान, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो!”
मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या 100 कोटींच्या वसुली प्रकरणात अनिल देशमुख सध्या तुरुंगात आहेत. याप्रकरणात ईडीने अनिल देशमुख यांचे पुत्र योगेश देशमुख आणि पत्नी शीतल देशमुख यांच्या वैयक्तिक 11 मालमत्ता जप्त केल्या होत्या. ईडीने जप्त केलेली मालमत्ता ही 180 दिवसानंतरची कारवाई आहे. त्यामुळे कायद्यानुसार अशा प्रकारे 180 दिवसाच्या नंतर मालमत्ता जप्त करता येत नाही. यापकरणी सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटकारत या सर्व मालमत्ता मुक्त करण्यास सांगितले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ईडीला अनिल देशमुख यांचे पुत्र आणि सुन यांच्या मालमत्ता परत कराव्या लागणार आहेत.