ऑनलाईन टीम / मुंबई :
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूरमधील निवासस्थानी ईडीने शुक्रवारी छापे टाकले.त्यानंतर रात्री उशिरा अनिल देशमुख यांचे पीए संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना अटक करण्यात आले असून, आता देशमुख यांना समन्स बजावण्यात आले आहेत. याप्रकरणावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत भाजपावर जोरदार हल्ला चढवला आहे.
संजय राऊत म्हणाले, ‘राज्यातील नेते, मंत्र्यांवर काही आरोप असतील तर राज्यातील तपास यंत्रणा चौकशी करण्यास सक्षम आहे हे आम्ही वारंवार सांगत आलोय. पण महाराष्ट्रातील मंत्र्यांना, मग ते शिवसेनेचे असोत राष्ट्रवादीचे असोत की काँग्रेसचे, त्यांना ठरवून त्रास दिला जात आहे. पण आम्ही बघून घेऊ,’ असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.
- काँग्रेसशिवाय विरोधी पक्षाची आघाडी अशक्य
पुढे ते म्हणाले, देशात विरोधी पक्षांची मजबूत आघाडी बनण्याची तयारी सुरू आहे. पण ही आघाडी काँग्रेसशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. काँग्रेस असल्याशिवाय विरोधी पक्षांची आघाडी आकार घेऊ शकत नाही. शरद पवार यांचेही असेच म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेनेही हेच म्हटले आहे.