मुंबई \ ऑनलाईन टीम
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची कोट्यावधी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाख रुपये किंमतीची संपत्ती ईडीनं जप्त केली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ही मालमत्ता अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची आहे. मुंबई आणि नागपूरमधील ही मालमत्ता असल्याची माहिती मिळत आहे. ईडीने केलेली ही कारवाई म्हणजे अनिल देशमुख यांना हा एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीच्या आरोपानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढल्या. अखेर या प्रकरणात अनिल देशमुख यांना आपल्या गृहमंत्रिपदाचा सुद्धा राजीनामा द्यावा लागला. यानंतर संपूर्ण प्रकरणाचा तपास ईडीने आपल्या ताब्यात घेतला असून आता कारवाई सुद्धा सुरू केली आहे.
माझ्या माहितीप्रमाणे १०० कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराची माहिती ईडीकडे आली आहे. आज ४ कोटी जप्त झाले आहेत, येत्या काही दिवसांमध्ये ते १०० कोटींपर्यंत जाणार आहेत. येत्या काही दिवसांमध्ये ईडी अनिल देशमुखांना अटक करेल, असा दावा या कारवाईनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.