मुंबई/ प्रतिनिधी
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तीन वेळा समन्स बजावूनही चौकशीला गैरहजर राहिल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. देशमुख यांना ईडीने तीन वेळा समन्स बजावूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्याविरूद्ध लवकरच अजामीनपात्र वाॅरंट काढले केले जाणार आहे. त्याबाबत कायदेशीर बाबींची पूर्तता केली जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
देशमुखांच्या मुलाचीही चौकशीकडे पाठ
अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख याला ईडीने समन्स पाठवून मंगळवारी चौकशीसाठी ईडी कार्यलयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्यानेही त्याकडे पाठ फिरवल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये स्वतःसह कुटुंबातील सदस्यांनाही ईडीच्या कठोर कारवाईपासून संरक्षण मागितले आहे. त्यामुळे ऋषिकेश देशमुख हे चौकशीसाठी गैरहजर राहिले असल्याचे सांगण्यात येते.