ऑनलाईन टीम / मुंबई :
मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने सात हजार पानी आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात देशमुख यांची दोन मुले ऋषिकेश आणि सलील देशमुख यांचीही नावे आहेत.
मुंबईच्या माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या खंडणीचा आरोप केला होता. या प्रकरणाची चौकशी करणाऱया अंमलबजावणी संचालनालयाने आज देशमुख यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणातील ईडीचे हे दुसरे आरोपपत्र आहे. ईडीच्या पथकाने 2 नोव्हेंबरला अटक केली होती, तर त्यांचे स्वीय सचिव संजीव पालांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांना जूनमध्ये अटक करण्यात आली होती. आरोपपत्रात अनिल देशमुख यांना मुख्य आरोपी करण्यात आले आहे.
मनी लाँड्रिंग आणि पदाचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली सीबीआयने 21 एप्रिल 2021 रोजी देशमुख आणि त्यांच्या सहकाऱयांविरोधात तपास सुरू केला होता. देशमुख गृहमंत्री असताना त्यांनी बार आणि रेस्टॉरंटच्या मालकांकडून 4.7 कोटी रुपये वसुल केले होते. ही रक्कम डिसेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत मुंबई पोलिसांचे सहाय्यक निरीक्षक सचिन वाझेमार्फत वसूल करण्यात आली. या रकमेपैकी 4.18 कोटी रुपये दिल्लीतील 4 वेगवेगळय़ा शेल कंपन्यांमध्ये जमा करण्यात आले होते. या कंपन्यांनी ही रक्कम श्री साई शिक्षण संस्थान नावाच्या ट्रस्टला दिली. ही ट्रस्ट अनिल देशमुख आणि त्यांचे कुटुंब चालवतात. म्हणजेच वसुलीचा पैसा शेल कंपन्यांच्या माध्यमातून देशमुख यांच्या ट्रस्टवरच वापरला गेला होता.