मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रस्ताव पत्रे प्रदान : दहा हजार नोकऱया देण्याचा पुनरुच्चार
प्रतिनिधी /पणजी
अनुकंपा तत्वावर एकूण 92 जणांना नोकरीच्या प्रस्तावाची पत्रे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते काल सोमवारी देण्यात आली. पर्वरी सचिवालयातील सेमिनार हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. पर्सनल खात्यातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नोकरी मिळालेल्या सर्व लाभार्थींनी त्यांना नेमण्यात आलेल्या खात्यांमध्ये कामावर रूजू व्हावे. खातेबदलासाठी मंत्री, आमदारांकडे तक्रारी करू नयेत, कोणावरही दबाव आणू नये, असे आवाहनही डॉ. सावंत यांनी संबंधितांना केले आहे.
अफवा, गैरसमजास बळी पडू नये
सरकारी नोकरी पात्रता गुणवत्तेनुसारच देण्यात येते. त्याबद्दल अनेक अफवा, गैरसमज पसरवले जातात. त्यावर कोणी विश्वास ठेवू नये आणि त्यास बळी पडू नये असेही डॉ. सावंत यांनी नमूद केले. अनुकंपा तत्वावरील नोकरीत नियमात काही बदल करण्याचा प्रस्ताव असून ते कालांतराने होतील, असेही त्यांनी सुचित पेले.
दहा हजार नोकऱयांचा पुनरुच्चार
सरकारी खात्यात सेवा बजाविताना मृत्यू आल्याने घरातील कमावता सदस्य गमावला आहे, अशा कुटुंबांच्या हितासाठी सरकारने अंमलात आणलेल्या सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत हे आदेश जारी करण्यात आले आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यानी राज्यातील तरुणांना दहा हजार नोकऱया देण्याचा सरकारचा विचार असून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी त्या दिशेने पावले टाकल्याचे सांगितले. सरकारी सेवेत असताना मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या आश्रित कुटुंबातील सदस्यांना आधार देण्याची सरकारच्या जबाबदारीचा एक भाग म्हणून ही सामाजिक सुरक्षा योजना लागू केली आहे, असेही ते म्हणाले.
अनाथ मुलांच्या आधारासाठी योजना
उत्पन्नाची मर्यादा 3.50 लाख रुपये असलेल्या योजनेत सुधारणा करण्याचा सरकारचा हेतू आहे, ज्यामुळे क श्रेणीतील कर्मचाऱयांना या योजनेचा लाभ मिळेल. या योजनेत ज्यांनी आईवडील गमावले आहेत अशा अनाथ मुलाला आधार देण्याची तरतूदही आहे आणि त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यावर वय 18 ते 21 वर्षे पूर्ण झाल्यावर सरकारी नोकरीसाठी ते पात्र आहेत.
नोकरीसाठी पैसे घेतले असल्यास तक्रार द्यावी
सरकारकडे नोंद असलेल्या पात्रतेनुसार या नोकऱया देण्यात आल्या असून त्यांनी संबंधित खात्याकडे जाऊन नेमणूक पत्र घ्यावे. तसेच एखाद्याची पात्रता जास्त असेल आणि त्यास कमी पात्रतेची नोकरी मिळाली असेल तर त्याच्या खात्याच्या नियमावलीनुसार कालांतराने बढतीसाठी विचार होऊ शकतो, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. या नोकरीसाठी कोणी, पैसे घेतले असतील तर त्याची तक्रार पर्सनल खात्याकडे करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सूचविले आहे.