भूसेना प्रमुख नरवणेंकडून भलावण, दहशतवाद्यांना निर्वाणीचा इशारा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारा घटनेतील अनुच्छेद 370 निष्प्रभ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय ‘ऐतिहासिक’ आहे. या निर्णयामुळे या राज्यातील दहशतवादी व फुटीरवाद्यांची कारस्थाने फिस्कटली, अशी भलावण नवे भूसेना प्रमुख एम. एम. नरवणे यांनी केली. ते येथे बुधवारी आयोजित 72 व्या भूसेना दिनाच्या भव्य आणि शानदार कार्यक्रमात बोलत होते.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे काश्मीरमध्ये फुटीरता माजविण्याचे आणि दहशतवादाची आग पेटविण्याचे पाकिस्तानचे मनसुबे धुळीला मिळाले आहेत. अनुच्छेद 370 प्रभावहीन केल्याने सीमेवर नियुक्त भारतीय सेनेचेही काम सुकर झाले आहे. ‘दहशतवादासंबंधी शून्य सहानुभूती’ हे भारतीय सेनेचे धोरण असून ते कठोरपणे क्रियान्वित केले जाईल. सर्व सैनिक व अधिकाऱयांनी डोळय़ात तेल घालून सीमेचे संरक्षण करावे. शत्रूला कोणतीही संधी देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.
अनुच्छेद 370 निष्प्रभ करण्याच्या निर्णयाला अनेक विरोधी पक्षांनी व काही विचावंतांनी विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर भूसेना प्रमुखांचे हे विधान महत्वपूर्ण असून सरकारचे बळ वाढविणारे आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
आधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन
भूसेना दिनानिमित्त येथील करीअप्पा मैदानावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भूसेना प्रमुखांसह नौसेना प्रमुख करमबीर सिंग आणि वायुसेना प्रमुख आर. के. एस. भदूरिया आणि सरसेनापती बिपीन रावत हे सुद्धा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यानिमित्र सेनेचे दिमाखदार संचलन करण्यात आले. त्यात भूसेनेकडील अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे दर्शन उपस्थितांना घडविण्यात आले. त्यात विमाने, क्षेपणास्त्रे, तोफा आणि बंदुकांचा समावेश होता.
संचलनाचे नेतृत्व महिलेकडे
इतिहासात प्रथमच पुरूष सैनिकांच्या संचलनाचे नेतृत्व यावेळी सेनेतील महिला अधिकारी कॅप्टन तानिया शेरगिल यांच्याकडे सोपविण्यात आले होते. तानिया शेरगिल यांची नुकतीच सेनेत नियुक्ती झाली असून त्या पूर्णवेळ कॅप्टन आहेत. संचलन नेतृत्व त्यांच्याकडे सोपविण्याच्या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
स्पष्टोक्तीमुळे समाधान
ड अनुच्छेद 370 संबंधी सेनाप्रमुखांच्या स्पष्टोक्तीने अनेकांना समाधान
ड मात्र, विधानावर विरोधकांकडून टीका केली जाण्याची शक्यता व्यक्त
ड सेनेत महिलांच्या वाढत्या सहभागाचेही या दिनानिमित्त झाले दर्शन