989 कोटी निधीची तरतूद ः जिल्हय़ातील हजारो कुटुंबांना होणार लाभ
प्रतिनिधी/ बेळगाव
अनुसूचित जाती-जमातीतील कुटुंबांना वीज बिल भरणे कठीण जात असल्याने राज्य सरकारने 75 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना ग्रामीण भागातील अनुसूचित जाती-जमातीतील कुटुंबांना लागू करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील 29.26 लाख कुटुंबांना मोफत वीज दिली जाणार आहे. यासाठी 989 कोटी रुपये निधीची तरतूद राज्य सरकारने केली आहे.
राज्यातील विद्युत विभागाने काढलेल्या आदेशाप्रमाणे 1 मेपासून ही योजना राज्यभरात लागू करण्यात आली आहे. सध्याची परिस्थिती पाहता अनुसूचित जाती-जमातीतील कुटुंब हे बीपीएलधारक आहेत. भाग्य ज्योती व कुटीर ज्योती या योजनेंतर्गत यापूर्वी 40 युनिटपर्यंत वीज मोफत दिली जात होती. सध्या 1.46 कोटी घरांमध्ये 75 युनिटपेक्षा कमी विजेचा वापर केला जातो. राज्यातील 29.26 लाख कुटुंबे या योजनेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर वाढीव बोजा पडणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व डॉ. बाबू जगजीवनराम जयंतीचे औचित्य साधून ही योजना जाहीर करण्यात आली आहे. बेळगाव जिल्हय़ातील हजारो नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यामुळे वाढीव वीज बिलाचा फटका ग्रामीण भागातील अनुसूचित जाती-जमातीतील कुटुंबांना बसणार नाही.