पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनसमोर शरणागती पत्करली असून आपली भूमी चीनला बळकावू दिली आहे, या आरोपांनी गेला महिना गाजवला आहे. ज्या पक्षाच्या सत्ताकाळात लडाखची 38 हजार चौरस किलोमीटरची भूमी चीनच्या घशात गेली त्या पक्षाच्या नव्या पिढीतील नेत्यांनी मोदींवर (अधिक भूमी गमावलेली नसताना) केलेले शरसंधान तसे हास्यास्पदच. पण या नेत्यांच्या सुरात सूर मिसळून मोदींवर आगपाखड करणाऱया विचारवंतांना आणि पुरोगाम्यांनाही ‘मोदींची खाशी जिरल्याचा’ आनंद लपविण्याचा प्रयत्न करूनही लपविता येत नव्हता. एकंदर सरकारविरोधी गटात एकाएकी अतिशय उत्साह संचारल्याचे दिसत होते. वृत्तपत्रांमधून, टीव्ही वृत्तवाहिन्यांच्या चर्चात्मक कार्यक्रमातून आणि समाजमाध्यमांतूनही ही मंडळी दात ओठ खाऊन मोदींवर आरोपांचा भडिमार करीत होती. तथापि, सरकार मात्र वरकरणी अबोल असल्याचे जाणवत होते. त्यामुळे तर विरोधकांना अधिकच चेव चढला होता. सरकारचे, विशेषतः मोदींचे मौन हे त्यांचे ‘तोंड बंद झाल्या’चेच द्योतक आहे, अशा थाटात विरोधी नेते व विचारवंत सरकारवर तुटून पडत होते. इतके, की अस्सल मोदी भक्तांच्या मनातही आपल्या नेत्याच्या क्षमतेसंबंधी शंकेची पाल चुकचुकावी. ही परिस्थिती गेल्या शुक्रवारपर्यंत होती. पण गेल्या शनिवारी पंतप्रधान मोदींनी अचानकपणे लेह-लडाखचा दौरा केला. 15 जूनच्या संघर्षात जखमी झालेल्या सैनिकांची विचारपूस केली. प्रत्यक्ष त्या भूमीत जाऊन वरिष्ठ सेनाधिकाऱयांकडून परिस्थिती समजावून घेतली. त्यानंतर त्वरित स्थिती बदलू लागली. रविवारी देशाचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी चीनचे मंत्री वँग यी यांच्याशी दूरध्वनीवरून दोन तास बोलणी केली. त्यानंतर चोवीस तासांमध्ये चिनी सेना प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून माघारी जाण्यास प्रारंभ झाल्याचे वृत्त थडकू लागले. प्रारंभी त्यावर कोणाचा विश्वास बसला नाही. तथापि, नंतर हे वृत्त खरे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतरच्या तीन दिवसांमध्ये सीमेवरील जवळपास सर्वच संघर्ष बिंदूंवरून चिनी सेना साधारणतः दोन किलोमीटर मागे गेल्याचे स्पष्ट झाले आणि दोन महिने सातत्याने राहिलेला तणाव निवळू लागल्याचे अनुभवास आले. भारताने सावध पवित्रा घेत पडताळणी केल्याशिवाय काही बोलणार नाही, अशी यथायोग्य भूमिका घेतली. अखेर गुरूवारी चीनची सेना सर्वच क्षेत्रांमधून माघारी गेल्याचे, तसेच भारतानेही आपली नियंत्रण रेषेवरची सेना तितकीच मागे घेतल्याचे अधिकृतरित्या स्पष्ट करण्यात आले. आता आवाप् होण्याची वेळ सरकारच्या विरोधकांवर आली. पारडे फिरल्याचे दिसू लागले होते. ज्या कथित चिनी आक्रमणाच्या भरवशावर सरकारचा नक्षा उतरविण्याची स्वप्ने जे दिवसाढवळय़ा पहात होते, त्यांची दिवास्वप्ने भंग पावून त्यांना खडबडून जागे व्हावे लागले. आपल्या अपेक्षांच्या विपरीत घडत आहे, याचा साक्षात्कार त्यांच्यासाठी असहय़ होत होता, हे देखील स्पष्ट कळत होते. पण त्यांचा नाईलाज होता. नियंत्रण रेषेवरून चीनचे सैन्य मागे हटणे म्हणजे मोदींविरोधातील एक कोलीत विझण्यासारखेच होते. हे त्यांच्यासाठी एक प्रकारे तोंडघशी पडणेच होते. पण हे सर्व घडेपर्यंत सरकार किंवा पंतप्रधान मोदी हे नशिबावर भरोसा टाकून स्वस्थ बसले होते काय? विरोधकांची समजूत तशी झाली असली तरी प्रत्यक्षात तसे मुळीच नव्हते. याच काळात सरकारने चीनविरोधात बरीच आंतरराष्ट्रीय मोर्चेबांधणी गाजावाजा न करता केलेली होती. अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटन, जपान इत्यादी देशांशी संधान बांधण्यात आलेले होते. सीमेवरील परिस्थितीची, तसेच कोणत्याही अवस्थेत भारत मागे हटणार नसल्याची माहिती त्यांना देण्यात आली होती. त्याचे काही परिणामही दिसू लागले होते. अमेरिकेने युरोपमधील सैन्य कमी करून आशियात ते नियुक्त करण्याची योजना घोषित केली. इतर महासत्ता तसेच ऑस्ट्रेलियानेही चीनचा कठोर शब्दांमध्ये निषेध केला. भारताच्या बाजूने आपण आहोत असे निसंदिग्धपणे चीनला बजावले. अमेरिकेने आपल्या दोन विमानवाहू युद्धनौका दक्षिण चिनी समुद्रात आणल्या. युद्धाभ्यास सुरू केला. इतकेच नाही तर भारताने चीनला आर्थिक फटका देण्याचाही निर्धार करत चीनची 59 लोकप्रिय ऍप्स बंद केली. याचा चीनला 40 हजार कोटींचा फटका बसेल असे अनुमान प्रत्यक्ष चीननेच व्यक्त केले. याशिवाय चीनला दिली जाणारी कंत्राटे, चीनकडून आयात होणाऱया वस्तूंवरही बंदी घालण्यात आली. हे होत असताना भारतीय सेनाही गप्प नव्हती. चीनच्या तोडीस तोड सैन्य सीमेवर आणण्यात आले. लढाऊ विमानांच्या वायु कसरती आणि भूसेनेबरोबरचा संयुक्त सराव सुरू करण्यात आला. या साऱया प्रयत्नांमधून जी वातावरण निर्मिती झाली तिचा एकत्रित परिणाम असा होता की भारत शरणागत होणार नाही. तो प्रतिकाराला सज्ज आहे. तसेच भारत एकटा नाही. त्याच्यासोबत इतर मोठे देश आहेत, याची पुरेशी जाणीव चीनला झाली. अशा स्थितीत भारताला अधिक दुखावणे योग्य नाही. तशी कृती आपल्यावरही उलटू शकते, हे समजून आल्यावर चीननेही वेगळा विचार केला. त्याने तणाव कमी करण्यासाठी पावले उचलली. वास्तविक, विरोधी पक्षांनी आणि त्यांची तळी उचलणाऱया बुद्धिवाद्यांनी थोडी कळ काढणे आणि काय होते ते पाहणे आवश्यक होते. एकदम सरकारवर शरणागती पत्करल्याचा आरोप करणे सर्वथैव अनाठायी होते. तेवढा दम त्यांना धरवता न आल्याने आज त्यांची कोंडी झाली आहे आणि पुन्हा मोदींची बाजू भक्कम झाली आहे. अर्थात, भारताने सावध राहणे आवश्यक आहे. कारण चीनचा केव्हाही भरवसा देता येत नाही. आज मागे गेलेला चीन काही काळानंतर पुन्हा आक्रमक होऊ शकतो. म्हणून आपली बाजू पक्की ठेवणे आवश्यक आहे. विरोधकांनी राजकीय स्वार्थासाठी देशाच्या सुरक्षेच्या प्रश्नाचे भांडवल करण्याचा आततायीपणा करणे टाळले पाहिजे. कारण अशा आततायीपणाचा कोणताही लाभ होत नाही. उलट तोंडघशीच पडायला होते, हे आतातरी त्यांनी समजून घेतल्यास देशाच्या दृष्टीने चांगले होईल.
Previous Articleइंस्टाग्रामचे पिन कमेन्टस फिचर सर्वांकरीता होणार उपलब्ध
Next Article नोकर भरतीत जूनमध्ये वाढ
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.