ऑनलाइन टीम / बारामती :
‘अनेकांना वाटत होतं की, मी निवृत्त होईल. पण तसं घडलं नाही. महाराष्ट्राच्या जनतेनं तसं घडू दिलं नाही, असं म्हणत शरद पवारांनी भाजपाच्या नेत्यांना उत्तर दिलं. विधानसभा निवडणुकीत पवाराचं राजकारण संपलं आहे, असं म्हणणाऱया भाजपा नेत्यांचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज चांगलाच समाचार घेतला.
बारामतीमध्ये कृषीप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. चार दिवस चालणाऱया प्रदर्शनाचं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, अभिनेता आमिर खान, खासदार सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शरद पवार म्हणाले, की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ दिल्यानंतर मला वाटले, मला निवृत्त व्हा असे म्हणत आहेत की काय? अनेकांना वाटत होते, मी निवृत्त होईल, पण तसे काही घडले नाही. महाराष्ट्रातील जनतेने तसे घडून दिले नाही.