जागतिक रंगभूमी दिन विशेष : मराठी रंगभूमी-चित्रपटसृष्टीतील कलाकारांना गणपत यादव यांच्या उत्कृष्ट स्वयंपाकाची आजही आठवण
मनीषा सुभेदार / बेळगाव
आज जागतिक रंगभूमी दिन त्यानिमित्त…. अनेक कलाकारांना भोजन देऊन तृप्त केलेल्या बेळगावच्या एका अवलियाच्या आठवणी….
बेळगावसारखे रसिक, प्रेक्षक कोठेही नाहीत आणि गणपतसारखे जेवण कोठे मिळणार नाही…. ही प्रतिक्रिया होती ज्ये÷ नटवर्य प्रभाकर पणशीकर यांची. गणपत यादव आजच्या तरुणाईला बरेचसे अनभिज्ञ असे नाव. परंतु अनेक जुन्या-जाणत्या मंडळींना मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील कलाकारांना गणपत यादव हे नाव आणि त्यांचा उत्कृष्ट स्वयंपाक याची आजही आठवण आहे. आज गणपत हयात नाहीत. परंतु त्यांचे मेहुणे मनोहर यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
बेळगावमध्ये आज अनेक मंडळी गाडय़ावर चहा देण्याचा व्यवसाय करतात. परंतु याचा श्रीगणेशा केला तो गणपत यादव यांनी. त्यांचे मूळ गाव कुर्ली. मात्र, अमाशी नावाच्या एका व्यक्तीने त्यांना घरी मदतीसाठी बेळगावला आणले. त्यामुळे तिसरीत असतानाच गणपत बेळगावला दाखल झाले. त्यांचे काम करत करत अनेक ठिकाणी बाहेरची कामेही ते करू लागले. प्रारंभी ‘सत्कार हॉटेल’ आणि त्यानंतर ‘कॅफे विहार’ येथे काम करू लागले. या ठिकाणी बेळगावमधील अनेक व्यापारी चहासाठी येत. त्यांचा परिचय झाल्याने तुमचा वेळ जातो तर मी तुम्हाला चहा पोहोचवू का? असे त्यांनी विचारले. नोंद घेण्याजोगी बाब म्हणजे मालकांनीसुद्धा याला आक्षेप घेतला नाही आणि तेथून बेळगावमध्ये दुकानदार, व्यापारी, व्यावसायिक यांना किटलीतून ते असतील तेथे जावून चहा देण्याची सुरुवात गणपत यांनी सुरू केली.
ग्राहक वाढू लागले तसे त्यांनी हंस टॉकीजजवळील पिसे या लोहाराकडून हातगाडी करवून घेतली आणि चहाबरोबरच उप्पीट, पोहे, खारा हे पदार्थ अवघ्या चार आण्यामध्ये देण्यास सुरुवात केली. पुरीभाजीचा दर आठ आणे होता. उत्कृष्ट चवीमुळे गणपत यांच्याकडे ग्राहक वाढू लागले आणि अशाच एका नाटकादरम्यान कलाकारांच्या भोजनासाठी त्यांच्याकडे विचारणा झाली. गणपत यांनी आनंदाने ही जबाबदारी स्वीकारली. तेथून कलाकारांच्या भोजनाची व्यवस्था गणपतनेच करावी, असा आग्रह कलाकार मंडळी करू लागली. यावरून त्यांच्या हाताला किती चव होती, याचा आपण अंदाज करू शकतो.
बेळगावला त्यावेळी अनेक नाटकांचे प्रयोग होत असत. प्रयोगानंतर कलाकारांचे भोजन घेऊन गणपत गोगटे रंगमंदिर किंवा कलामंदिर येथे नेवून पोहोचवत. घरी येण्यास त्यांना साधारण रात्रीचे 2 वाजत. प्रभाकर पणशीकर, बबन प्रभू, अशोक सराफ, रंजना, डॉ. श्रीराम लागु, विक्रम गोखले, चित्तरंजन कोल्हटकर, नाना पाटेकर, दत्ता भट्ट, डॉ. काशिनाथ घाणेकर, सतीश दुभाषी, आशा काळे, शरद तळवलकर, फैय्याज, मधु कांबीकर, जयश्री गडकर, रुही बेर्डे यांच्यासह अनेक कलाकारांनी गणपत यांच्या भोजनाचा आस्वाद घेतला आहे.
त्यांचे मेहुणे आणि नंतर झालेले जावई मनोहर हे फार पूर्वीपासून त्यांच्या समवेत काम करत. मात्र, या दोघांचे नाते हे बाप-लेकाचे होते. मनोहर सांगतात जर कलाकार दुपारी पोहोचले तर आल्या आल्या जेवणाची तयारी कर, असा निरोप पाठवत. अनेक कलाकारांना वरणभात आणि त्यावर तूप याचे अप्रुप असे. मुंबईत असे तूप मिळत नाही, असे ते सांगत. कलाकारांसाठी आम्ही बासमती तांदळाचा भात शिवाय अनेक चटण्या आणि कोशिंबिरी देत होतो. त्यामुळे दुपारी आणि रात्रीचे जेवण गणपत यांच्याकडचेच हवे, असा आग्रह कलाकार धरत
होते.
त्यावेळी 5 रुपये हा एका ताटाचा दर होता. अर्थात तेव्हा पत्रावळी असत. डॉ. काशिनाथ घाणेकर दौऱयावर येत असत तेव्हा गणपतचेच जेवण हवे, असा हुकूम देत. पत्रावळी पाहून त्यांनी गणपत यांना मला स्टीलचे ताट हवे, मला स्वच्छता लागते, असे सांगितले. त्यावर ताट घेणे परवडत नाही, असे सांगताच डॉ. घाणेकर यांनी मॅनेजर श्याम यांना बोलावून ‘माझ्या नाईटचे पैसे यांना दे’ असे सांगितले होते. अर्थात भावोजींनी हे पैसे घेतले नाहीत पण ताट देण्यास सुरुवात केली, अशीही आठवण मनोहर यांनी सांगितली.
बेळगावला पावभाजीची ओळख करून दिली
पुढे बेळगावला नाटक येण्याचे प्रमाण कमी झाले. इतक्मया दिग्गज कलाकारांसमवेत गणपत आणि आमचा परिचय झाला. परंतु त्याची फुशारकी आम्ही कधीच मारली नाही. पुढे भावोजींनी पावभाजी, भेळपुरी असे चटपटीत पदार्थ देण्यास सुरुवात केली. पावभाजीची कृती समजून घेण्यासाठी आम्ही दोघेही मुंबईला गेलो. त्यामुळे बेळगावमध्ये पावभाजीची ओळख आम्हीच करून दिली, असे म्हणायला हरकत नाही, याकडे मनोहर यांनी लक्ष वेधले.
कलाकारांसमवेतचे नाते मनातच जपले
गणपत यांचा 2000 साली मृत्यू झाला. आज केळकरबाग येथे इंडिया भेल हाऊस त्यांची मुले चालवत होती. दोन महिन्यांपूर्वी गणपत यांचे ज्ये÷ सुपुत्र दीपक यांचे निधन झाले. दुसरा मुलगा संतोष आणि दीपक यांचा मुलगा आता भेल हाऊसची जबाबदारी पाहतात. आज एक कलाकार जरी भेटला तर लोक त्याच्या भोवती गराडा घालून त्याला नकोसे करतात. मात्र, गणपत यांनी कलाकारांसमवेतचे नाते मनात जपले. म्हणूनच ते वेगळे ठरतात.
‘गणपत के पासही खाना खाना’
जिल्हा क्रीडांगणावर कल्याणजी- आनंदजी यांची नाईट झाली. तेव्हा या दोघांना शाकाहारीच जेवण हवे होते. आम्ही त्यांना तीन-चार प्रकारच्या चटण्या, कोशिंबिरी, फुलके, चपाती, परोठा, भाकरी असे एकूण 36 पदार्थ वाढले होते. त्यामुळे तृप्तीची शाब्बासकी आम्हाला मिळाली. पुढे कल्याणजींचे भाऊ बाबला ऑर्केस्ट्रा घेऊन बेळगावला आले तेव्हा ‘गणपत के पासही खाना खाना’ असे कल्याणजींनी सांगून पाठविले होते. हीच आमच्या कष्टाची पोचपावती होती, असे सांगताना मनोहर यांना गहिवरून आले.
डॉ. काशिनाथ घाणेकर यांनीच आमच्या भोजनाची महाराष्ट्रापर्यंत प्रसिद्धी केली
बाबला ऑर्केस्ट्रासाठी सायरा बानो, दिलीप कुमार, जॉनी वॉकर, कविता कृष्णमूर्ती, अलका याज्ञिक असे कलाकार व गायक आले होते. यांनीही गणपत यांच्या भोजनाची चव चाखली. सायरा बानो यांना भाकरी अतिशय आवडली, अशी आठवण मनोहर यांनी सांगितली. डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा गणपत यांच्यावर विशेष लोभ होता. त्यांनीच आमच्या भोजनाची महाराष्ट्रापर्यंत प्रसिद्धी केली. त्यामुळे डॉ. घाणेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी गणपत विमानाने मुंबईला गेले होते. यावरून किती कलाकारांचे प्रेम गणपत यांनी मिळविले याचे प्रत्यंतर येते.