मुख्य आर्थिक सल्लागार सुब्रमण्यम यांचे विधान
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार के.व्ही. सुब्रमण्यम यांच्यानुसार सरकार सणासुदीच्या काळात म्हणजेच पुढील महिन्यापर्यंत पायाभूत, ग्राहकोपयोगी उत्पादन निर्मितीसारख्या क्षेत्राला एक दिलासा पॅकेज देणार असल्याचे म्हटले आहे. हे आर्थिक पॅकेज छोटे असले तरीही अर्थचक्राला चालना देणारे ठरणार आहे. अर्थव्यवस्थेला गती प्रदान करण्यासाठी सणासुदीच्या काळापर्यंत काही अल्पकालीन उपाय केले जाऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले आहे.
देशाच्या जीडीपीत जून तिमाहीत 23.9 टक्क्यांची घसरण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेसाठी दुसरे दिलासा पॅकेज दिले जावे अशी मागणी वाढली आहे. सरकार आणखी एक मोठे आर्थिक पॅकेज आणू शकते. परंतु कोरोनावरील लस उपलब्ध झाल्यावर त्याची घोषणा होऊ शकते, असे सुब्रमण्यम यांनी म्हटले आहे.
मोठा प्रभाव पडणार
सर्वाधिक नुकसान झालेल्या क्षेत्रांमधील मागणी वाढविण्यावर लक्ष दिले जाऊ शकते. या क्षेत्रांमध्ये पायाभूत निर्मिती, उत्पादन, ग्राहकोपयोगी उत्पादनांचा समावेश आहे. या क्षेत्रांकरता करण्यात आलेले हे उपाय लहान असले तरीही त्यांचा ‘स्टेरॉइड’ सारखा प्रभाव पडणार असल्याचे सुब्रमण्यम म्हणाले.
प्रकल्पांच्या कामाला वेग
सुमारे 103 लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. आंशिक काम पूर्ण झालेल्या प्रकल्पांची पूर्तता करण्यावर भर देण्यात येत आहे. या प्रयत्नांमुळे निर्मितीकार्यांना चालना मिळणार आहे. तेच यातून गुणवत्तापूर्ण खर्चाला बळ मिळणार असल्याचे सुब्रमण्यम यांनी सांगितले आहे.