प्रतिनिधी/कोल्हापूर
शहरातील दवाखान्यामध्ये शेकडो रुग्ण विविध आजारांवर उपचार घेत आहेत. शहराच्या फुटपाथ, बसस्टॉपवर अनेक फिरस्ते आश्रय घेत आहेत. संचार बंदीमुळे २४ तास पोलिस रस्त्यावर आहे. अवनी संस्थेमध्ये वृद्ध, विधवा, परितक्त्या महिलांची संख्या वाढतच आहे. अशा या घटकांच्या पोटासाठी संचारबंदीच्या काळात मोफत अन्न पुरवण्याची जबाबदारी श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टने उचलली आहे. त्यांच्या या कार्यावर तरुण भारत सोशल मिडियाने टाकलेला प्रकाशझोत.
कोरोना या संसर्गजन्य आजाराने जगभराची डोकेदुखी वाढत चालली आहे. देशात १४ एप्रिलपर्यंत शटडाऊन करण्यात आले आहे. राज्यात तसेच कोल्हापुरात संचारबंदी लागू आहे. त्यामुळे हातावरचे पोट असणाऱ्या अनेक जणांचे अन्नपाण्याविना हाल होत आहेत. छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालया बरोबरच महापालिकेच्या इतर रुग्णालयांमध्येही अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईकही रुग्णालयामध्ये असल्यामुळे संचारबंदीच्या काळात त्यांना सहजतेने अन्न उपलब्ध होणे कठीण होत आहे.
अशीच परिस्थिती शहरातील अनेक फूटपाथ, बस स्टॉप सह जुन्या इमारतींचा आधार घेऊन राहिलेल्या फिरस्त्यांवर आली आहे. अन्नाविणा तफडणाऱ्या या जीवांना एक वेळचे अन्न द्यावे ही भावना अनेक व्यक्ती, संस्थांमध्ये आहे. मात्र संचारबंदीमुळे आणि कोरोनाच्या धोक्यामुळे ते पुढे येऊ शकत नाहीत. जनतेच्या संरक्षणासाठी दिवस-रात्र बंदोबस्तावर तैनात असणाऱ्या पोलिसांना देखील गेल्या काही दिवसात फूड पॅकेट्स उपलब्ध झाली नव्हती तसेच अवनी संस्थेमध्ये निराधार विधवा परितक्त्या वृद्धा वास्तव्यास आहेत त्यांच्याही पोटाची जबाबदारी घेणे गरजेचे होते.
या सर्वच घटकांच्या मदतीला श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट धावून आले आहे. ताराबाई रोड वर गेल्या अनेक वर्षापासून आई अंबाबाईच्या भक्तांच्या सेवेसाठी अन्नछत्र मंडळाची उभारणी करण्यात आली राजू मेवेकरी यांच्या पुढाकाराने दररोज शेकडो भाविकांना मोफत प्रसाद रुपी अन्न उपलब्ध झाले ह्या अन्नछत्रा च्या वतीने दररोज हजार ते बाराशे लोकांचे जेवण बनवले जाते यासाठी पहाटेपासूनच चार आचारी त्यांना सहकार्य करणाऱ्या १० महिला आणि ३० कार्यकर्ते अन्न बनवण्यापासून दात्यापर्यंत पोहोचवण्याच्या कामात व्यस्त असतात.
दुपारपर्यंत हजार ते बाराशे लोकांचे जेवण तयार केले जाते. २ चपाती, पांढरा भात, आमटी, भाजी असे तयार अन्न कार्यकर्ते पॅकेट्स् मध्ये भरतात. दुपारपर्यंत १ हजार ते बाराशे पॅकेट्स तयार होतात.सध्या संचारबंदी असल्यामुळे हे बनवलेले अन्य छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील तीनशे रुग्ण आणि नातेवाईकांपर्यत पोहोचविले जाते. सावित्रीबाईफुले रुग्णालयात शंभर, पंचांग हॉस्पिटलमध्ये शंभर, शहरातील फिरस्त्यांसाठी तीनशे, अवनी संस्थेसाठी शंभर पॅकेट्स तयार केली जातात. ही सर्व पैकेटस् काही वेळातच अन्नछत्रातील कार्यकर्त्यामार्फत ज्या त्या ठिकाणी पोहचविली जातात. या माध्यमातून भुकेलेल्याचे उदर भरण करण्याचे पुण्यकर्म श्री. महालक्ष्मी अन्नछत्रामार्फत केले जात आहे.
शिवभोजन थाळी सेवेला पुन्हा सुरवात
राज्य शासनाने अगदी दहा रुपये या अल्प किमतीमध्ये शिव भोजन थाळी सुरु केली. संपूर्ण राज्यभरामध्ये या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मात्र कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे हा उपक्रम राज्यभरात सध्या बंद पडला आहे. कोल्हापुरात श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या माध्यमातून शनिवार २८ मार्च पासून शिव भोजन थाळी उपक्रमाला पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे. संचारबंदीच्या काळातही या उपक्रमाला प्रतिसाद लाभतो आहे. पॅकेट मधून अन्न पार्सल देण्याची सोयही या अन्नछत्र मंडळाने केली आहे.
पोलीसांसाठी दररोज पाचशे अन्न पाकिट
गेल्या आठ दिवसापासून राज्यात व शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या आरोग्याचा आणि आहाराचा विचार करून श्री महालक्ष्मी अन्नछत्र मंडळ सेवा ट्रस्ट च्या वतीने दररोज पाचशे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पॅकिंग केलेले अन्न पोहोच केले जात होते शनिवारपासून पोलीस दलाने स्वतः ही जबाबदारी उचलल्यामुळे आता हेच अन्न गरजू घटकांना दिले जात आहे.
जगात सर्व सेवेमध्ये अन्न दानाची सेवा पुण्य मानली जाते. आई अंबाबाईच्या कृपेने आजवर या उपक्रमांमध्ये खंड पडलेला नाही. दात्यांचे पाठबळ असल्यामुळे हा उपक्रम अखंडित सुरू राहिल. त्यामुळे आयुष्यभर आपल्या सहकाऱ्यांसोबत हे अन्नदानाचे व्रत सुरूच ठेवणार असल्याचे श्री. महालक्ष्मी अन्नछत्र मंडळ सेवा ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी सांगितले.
या उपक्रमाला सुरवातीपासून मेवेकरी यांचे सहकारी संजय जोशी, राजू सुगंधी, सुनिल खडके, आदित्य मेवेकरी, प्रशांत तहसिलदार, तन्मय मेवेकरी, अंकित भोसले, विराज कुलकर्णी, सुनिल जोशी, गिरिष कुलकर्णी, सतिश सरनाईक यांच्यासह कार्यकर्ते व कार्मचारी वर्गाचे पाठबळ लाभले आहे.