ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वादग्रस्त ठरलेले तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा आज केली आहे. त्यामुळे मागील वर्षभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला यश आले असून, देशाच्या अन्नदात्यांनी सत्याग्रहाच्या मार्गानं अहंकाराची मान झुकवली, असे म्हणत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आपला एक जुना व्हिडिओही ट्विट केला आहे.
राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, देशाच्या अन्नदात्यांनी सत्याग्रहाच्या मार्गानं अहंकाराची मान झुकवली. अन्यायाविरुद्ध विजयाच्या शुभेच्छा… या ट्विटमध्ये शेअर करण्यात आलेल्या जुन्या व्हिडिओत म्हटले आहे की, मोदी सरकारला एक दिवस तीनही कृषी कायदे मागे घ्यावे लागतील, हे माझे शब्द जपून ठेवा. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा मला अभिमान वाटतो, मी या आंदोलनास पूर्णपणे समर्थन देत आहे. मी शेतकऱ्यांसोबत असून, पंजाबमध्ये जाऊन हा मुद्दा उपस्थित करणार आहे. तर, सरकारला हे तीन कायदे मागे घेण्यासाठी भाग पाडू, असे राहुल गांधींनी या व्हिडिओत म्हटल्याचे दिसून येते. या व्हिडिओचा हवाला देत आपला शब्द खरा ठरल्याचं राहुल गांधींनी सूचवलं आहे.