वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचे अन्नधान्याचे उत्पादन वर्ष 2020-21 मध्ये दोन टक्क्यांनी वाढून 30 कोटी 33 लाख टन इतक्या सर्वोच्च पातळीवर राहणार असल्याचा अंदाज आहे. कृषी मंत्रालयाने म्हटले आहे, की मागच्या वर्षी मान्सून चांगला झाल्यामुळे तांदूळ, गहू, डाळी आणि अन्य पिकांचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन होणार असल्याची माहिती आहे.
पिक वर्ष जुलै ते जूनपर्यंत असते. यामध्ये वर्ष 2019-20 मध्ये देशातील अन्नधान्य उत्पादन विक्रमी 29 कोटी 75 लाख टन राहिले होते. कृषी मंत्रालयाने 2020-21 मध्ये दुसऱया वेळी सादर केलेल्या अंदाजामध्ये अन्नधान्य उत्पादन विक्रमी म्हणजे 30 कोटी 33.4 लाख टन होण्याची शक्यता आहे.
सदरच्या आकडेवारीचे शेय हे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकरी आणि संशोधकांच्या प्रयत्नासोबत केंद्राच्या नियोजनाला दिले आहे. वर्षाच्या आधारे तांदूळ उत्पादन मागील वर्षात 11 कोटी 88.7 लाख टनाच्या तुलनेत विक्रमी 12 कोटी 3.2 लाख टन झाले तर गहू उत्पादन हे मागच्या वर्षातील 10 कोटी 78.6 लाख टनाच्या तुलनेत वर्ष 2020-21 मध्ये 10 कोटी 92.4 लाख टन होणार असल्याचा अंदाज आहे.
उत्तम हवामानाचा प्रभाव
देशभरात समाधानकारक पावसामुळे विविध पिकांचे उत्पादन हे विक्रमी पातळीवर झाल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.