प्रतिनिधी/खानापूर :
अन्नभाग्य योजनेखाली गरिबांना देण्यात येणाऱया तांदळाची तस्करी करणाऱयांना पकडण्यात खानापूरच्या आहार निरीक्षकांना तसेच नंदगड पोलिसांना यश आले. याप्रकरणी दोन ट्रक जप्त करून 5 जणांना ताब्यात घेण्यात आले. 12 लाख 12 हजार रुपये किमतीचा तांदूळ व प्रत्येकी 20 लाख रुपये किमतीचे दोन ट्रक असा एकूण 52 लाखाचा मुद्देमालही जप्त करण्यात आला.
हुबळीहून महाराष्ट्रात अन्नभाग्य योजनेतील 2 ट्रक तांदूळ विक्रीसाठी जात असल्याचा सुगावा खानापूरचे आहार निरीक्षक छोटन्नावर व त्यांच्या सहकाऱयांना मिळाला. यावरून त्यांनी खानापूर-तालगुप्पा रस्त्यावर गोल्याळीनजीक नंदगड पोलिसांच्या मदतीने पाळत ठेवली. गुरुवारी सकाळी याच मार्गे दोन ट्रक येत होते. ते अडवून तपासणी केली असता दोन्ही ट्रकमध्ये 1200 पोती तांदूळ सापडला. त्याची अंदाजे किंमत 12 लाख 12 हजार रुपये इतकी होते. याप्रकरणी 5 जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यामध्ये रियाज अहमद हनीफ, यल्लाप्पा बिंगी, महंमद हनीफ, हुसेनसाब दिवान खान, सुरेश बन्नीगोळ सर्व रा. हुबळी यांचा समावेश आहे.सदर तांदूळ हुबळीहून महाराष्ट्रात विक्रीसाठी नेला जात असल्याचे त्यांनी कबूल केले.
यानंतर दोन्ही ट्रक मुद्देमालासह नंदगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. खानापूरचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे, नंदगडचे पोलीस उपनिरीक्षक उस्मान आवटी अधिक तपास करीत आहेत.