प्रेंच राज्यक्रांती झाली त्यावेळच्या परिस्थितीचे वर्णन असे केले जाते की फ्रान्समधले नव्वद टक्के लोक उपासमारीने मरत होते आणि दहा टक्के अपचनाने मरत होते. दुसऱया शब्दांत सांगायचे तर बहुसंख्य लोकांना पुरेसे अन्न मिळत नसताना मूठभरांना खाऊन संपणार नाही इतके पदार्थ मिळत होते. आज, जगातील बहुतेक राष्ट्रांत आधुनिक शासनव्यवस्था आल्या आहेत, औद्योगिक प्रगती झाली आहे, जिकडेतिकडे गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या आहेत आणि आलिशान मोटारिंचा सुळसुळाट झाला आहे; तरीही उपासमारीचे आयुष्य जगणाऱयांची संख्या काही कमी नाही. ती जागतिक लोकसंख्येच्या नव्वद टक्के नसली तरी दहा टक्क्मयांपेक्षा अधिक आहे. जवळजवळ आठशे कोटी लोकसंख्या असणाऱया या वसुंधरेच्या पाठीवर शंभर कोटी लोक रोजच्या रोज हातातोंडाची गाठ पडत नाही असे जीवन कंठत आहेत.
सप्टेंबरच्या 29 तारखेस दरवषीप्रमाणे ‘आंतरराष्ट्रीय अन्ननुकसान आणि नासाडीविरोधी जनजागृती दिन’ पाळण्यात येतो. त्यानिमित्त ‘संयुक्त राष्ट्र संघटने’च्या अन्न आणि कृषी संघटने’तर्फे (एफएओ) जी माहिती प्रसृत करण्यात आली तिने जागतिक उपासमारीच्या परिस्थितीचे विदारक चित्र उभे केले आहे. ही एक मोठी जागतिक समस्या आहे, कोणताही देश तीपासून मुक्त नाही. जगातील 81 कोटी 10 लाख लोक अर्धपोटी जीवन जगत आहेत आणि दोनशे कोटी लोक कुपोषणाचे भीषण परिणाम भोगत आहेत. त्यातच, ‘कोविड’जन्य परिस्थितीमुळे त्यांमध्ये 13 कोटी 20 लाख नव्या कुपोषितांची भर पडली आहे. दुसऱया एका पाहणीच्या आंकडेवारीनुसार, जगात 95 कोटी 70 लाख लोकांना पुरेसे खाणे मिळत नाही आणि 93 देशांना या समस्येने पुरते ग्रासले आहे. दुसरीकडे, 2019 सालात जगभरातून सतरा टक्के अन्न चक्क फेकून दिल्यामुळे वाया गेले, ते कुणाच्याही मुखी लागले नाही.
जगातील एकूण अन्नपुरवठय़ाचा सत्तर टक्के वाटा लहान शेतकरी, मेंढपाळ आणि मच्छिमार उचलतात, पण धान्ये, भाजीपाला, मांसमच्छी इत्यादी खाद्यान्न निर्माण करणाऱया याच वर्गाला स्वतःलाच पुरेसे खाणे मिळत नाही. हे सगळे प्रामुख्याने ग्रामीण भागात राहतात आणि दारिद्रय़ आणि उपासमार यांचा ग्रामीण भागात जास्त तडाखा बसतो. याशिवाय आपसातील संघर्ष हेही अन्न तुटवडय़ाचे मोठे कारण आहे. गेल्या वषी तेवीस देशांतील जवळजवळ दहा कोटी लोकांवर वेगवेगळय़ा संघर्षाच्या स्थितीमुळे उपासमारीची वेळ आली. उपासमारीचा सर्वाधिक प्रमाणात बळी जाणारा घटक म्हणजे बालके. जगात दरवषी सुमारे 31 लाख बालके उपासमार आणि भुकेमुळे मृत्यू पावतात. दर दहा सेकंदांनी एक बालक भूकबळी जाते. पांच वर्षांखालील नऊ कोटी नव्वद लाखांहून अधिक मुले कुपोषित आणि त्यामुळे कमी वजनाची आहेत. उपासमारीमुळे केवळ शारीरिक वाढच खुंटते असे नव्हे तर बौद्धिक आणि मानसिक वाढही खुंटते, शारीरिक शक्ती आणि कार्यक्षमता कमी राहते.
अन्न वाया जाते म्हणजे ते कोणाला खाता येत नाही एवढीच गोष्ट होत नाही. ते अन्न तयार करण्यासाठी वापरलेले पदार्थ, पाणी, इंधन-ऊर्जा, मनुष्याचे श्रम, वेळ आणि पैसा यांचेही प्रचंड नुकसान होते. याखेरीज, उरलेले अन्न कुठेतरी फेकून दिल्याने कचरा, घाण निर्माण होते, कुत्र्यांची पैदास वाढते, रोगराई पसरते आणि हरित वायूंची निर्मिती होऊन जागतिक तापमान वाढीत भर पडते. भूमी आणि जलश्रोतांवर ताण पडतो. याबरोबरच पदार्थांच्या किमती वाढतात. ‘एफएओ’च्या म्हणण्यानुसार पोषक खाद्यपदार्थ महाग होणे म्हणजे सामान्य माणसांना ते खाणे परवडण्यापलीकडे जाणे. तेव्हा असे अन्न वाया घालविण्याचे टाळावे असे आवाहन या संघटनेने केले आहे. अन्न कोठेतरी फेकून देण्यापेक्षा त्याचा वापर खतनिर्मितीसाठी करावा, आणि त्याहीपेक्षा मुळातच नासाडी टाळण्याचा प्रयत्न करावा, हे उत्तम असे या आंतरराष्ट्रीय संघटनेला वाटते.
या समस्येवर उपाय सुचविताना चांगले प्रशासन आणि मनुष्यबळ आवश्यक असल्याचे ‘एफईओ’ने स्पष्ट केले आहे. उद्दिष्टपूर्तीसाठी वेगवेगळय़ा संस्थांनी परस्परांचे सहकार्य घेतले पाहिजे. उपासमार नाहीशी करणे, अन्न पुरवठय़ासाठी ऍपसारख्या आधुनिक उपायांचा अवलंब करणे, पिकाचा हंगाम, प्रक्रिया आणि वाहतूक यांना लागणारा कालावधी कमी करणे वगैरे बाबींचा त्यात अंतर्भाव आहे.
तसे पाहता जगातील प्रत्येकाला पुरेसे खाणे मिळेल इतक्मया अन्नाचे उत्पादन होते, पण प्रचंड विषमता आणि पैशाचे असमान वाटप ही तसे न होण्यामागील महत्त्वाची करणे आहेत. त्याशिवाय अन्न वाया जाणे किंवा अन्नाची नासाडी होणे हे आणखी एक महत्त्वाचे आणि गंभीर कारण आहे. जगाच्या पाठीवर उत्पादित केलेल्या अन्नपदार्थांपैकी 14 टक्के पदार्थ शेतीमालाचे पीक काढण्यापासून दुकानातील वाहतुकीपर्यंतच्या टप्प्यात वाया जातात, तर आणखी 17 टक्के पदार्थ त्यांचा वापर आणि पुरवठा करण्याच्या टप्प्यात फुकट जातात. शेतातील पीक घेण्याच्या पारंपरिक पद्धती, गुरेढोरे, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेली अंशतः नासाडी, धान्याची वाहतूक, वाहनांकडून होणारे प्रदूषण वगैरे कारणांचा पहिल्या टप्प्याशी संबंध आहे. दुसऱया टप्प्यात 2 टक्के पदार्थ किरकोळ विक्री प्रक्रियेत वाया जातात, 5 टक्के पदार्थ अन्नपुरवठा सेवेदरम्यान वाया जातात. याचा अर्थ दर शंभर थाळय़ांमागे पांच थाळय़ा फुकट जातात, पण या सर्वांवर कडी होते ती घरगुती पातळीवर. पहिल्या आणि दुसऱया टप्प्यातील अनुक्रमे 14 आणि 17 मिळून जे 31 टक्के अन्न वाया जाते त्यातील एक तृतीयांश हिस्सा घरोघर फेकून दिल्या जाणाऱया अथवा फुकट जाणाऱया पदार्थांचा आहे.
याचा अर्थ, जगात उत्पादित होणाऱया एकंदर अन्नपदार्थांपैकी अकरा टक्के पदार्थ तुम्ही-आम्ही वाया घालवतो. ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ वगैरे श्लोक म्हणणाऱया आम्हा भारतीयांच्या देशात एकूण लोकसंख्येच्या पावपट जनता भुकेली राहते ही वस्तुस्थिती आहे. उरलेले अन्न मोलकरणीस देण्याची पद्धत मध्यमवर्गीय लोकांत आहे, कुत्र्याला, दारी आलेल्या भिकाऱयाला खाणे देण्याचे पुण्यकर्म बरीच माणसे करतात. तरीही ‘आम्ही उरलेले किंवा शिळे खात नाही’ अशी फुशारकी मारत एकादोघांची पोटे भरतील एवढे अन्न दररोज फेकून देणारेही काही कमी नाहीत. अशी माणसे एकदा घातले की रोजच पीडा मागे लागेल या ‘भीतीने’ ते अन्न कुत्र्याला किंवा गरीबालाही देत नाहीत. समारंभांमध्ये आयत्या वेळी कमी पडू नये म्हणून जास्तीचे शिजविले जाते. रुग्णालयात नातेवाईकांना घरून डबे नेताना त्यांना फार खाता येणार नाही हे ठाऊक असूनही भरपूर पदार्थ दिले जातात. तेव्हा ते तिथल्या कचरा कुंडीत टाकले जातात. कित्येक देवस्थानांतून मिळणारा महाप्रसाद फुकट मिळतो म्हणून थाळीत हवे तेवढे वाढून घेतले जाते आणि मग सगळे न संपविता टाकून दिले जाते. वसतिगृहातील मुलांना सुग्रास भोजन मिळत नाही म्हणून प्राचार्यांच्या घरी पक्वान्ने खाताना कष्टी होऊन स्वतःला कोंडून घेऊन अश्रू ढाळणाऱया साने गुरुजींच्या हृदयाची अधिकाधिक माणसे तयार होणे हाच यावर प्रभावी उपाय ठरेल.
राजेंद्रप्रसाद स. मसुरकर