पर्यटन-चित्रपट उद्योगक्षेत्राचा इशारा : टॅक्सीमालकांनी सामंजस्य दाखविण्याची हाक
प्रतिनिधी / पणजी
खाजगी टॅक्सीमालकांचे चालविलेले लाड थांबवून सरकारने आता त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी पर्यटन आणि चित्रपट क्षेत्रातील संबंधितांनी केली आहे. अन्यथा त्यांची दादागिरी वाढतच जाऊन पर्यटन जगतात गोव्याचे नाव सर्वत्र बदनाम होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्याचबरोबर टॅक्सीमालकांनीही अधिक ताणून न धरता सामंजस्य दाखवावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
रविवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ट्रव्हल अँड टुरिझम संघटनेचे अध्यक्ष निलेश शहा, लाईन प्रोडय़ुसर्स संघटनेचे अध्यक्ष संदीप कोटेजा, टूर ऑपरेटर आतिश फर्नांडीस, गोव्यातील प्रसिद्ध लाईन प्रोडय़ुसर शिवा बाबा नाईक, दिलीप बोरकर, जॅक सतिजा, ज्ञानेश्वर सावंत, फ्रान्सिस यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
कोरोनाच्या संकटामुळे सर्वज उद्योग व्यवसाय थंडावलेले आहेत. अशावेळी चालू असलेल्या कामातही अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न झाल्यास पर्यटन क्षेत्रात गोव्याचे नाव बदनाम होण्यास वेळ लागणार नाही. अशा अडथळे आणणाऱयावर सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आम्ही गोमंतकीय आदरातिथ्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहोत. अतिथीला देवासमान मानण्याच्या स्वभावामुळेच पर्यटक येथे येतात. परंतु काही किरकोळ लोकांमुळे गोव्याचे नाव बदनाम होत आहे. सध्या तर काही टॅक्सीमालक हातघाईवरच उतरले असून त्याचा प्रत्यय शनिवारी नेरूल येथे एका चित्रिकरणादरम्यान आला आहे. वाहनांची तोडफोड, कर्मचाऱयांवर हल्ला करणे यासारखे प्रकार त्यांनी केले आहेत. हे चित्र नक्कीच चांगले नाही. त्याही परिस्थितीत सरकारने असे कृत्य करणाऱयांवर कारवाई केली आहे, याबद्दल सरकार अभिनंदनास पात्र आहे, असे शहा म्हणाले.
आजच्या स्पर्धेच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात एखाद्या धंद्यात कुणीच मक्तेदारी प्रस्थापित करू शकत नाही. टॅक्सीमालकांनाही तोच नियम लागू पडतो. टॅक्सीमालकांनी मीटर बसवावे. मात्र स्वतःला कोणती टॅक्सी हवी याचा निर्णय प्रवाशांवरच सोडावा. त्यांच्यावर सक्ती करण्याचे प्रयत्न करू नये. त्याचबरोबर सरकारनेही त्यांच्यावर कायद्यानुसार मीटर बसविण्याची सक्ती करावी. सूट, सुविधा, योजना देऊन त्यांचे चालविलेले लाड पुरे झाले. आता कारवाईची वेळ आली आहे. राज्यातील 40 टक्के लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. अशावेळी पुढील महिन्याभरात हे चित्र न बदलल्यास गोव्यात येणाऱया पर्यटकांच्या संख्येत प्रचंड घट होईल व परिणाम केवळ टॅक्सीमालकांवर नव्हे तर संपूर्ण पर्यटन क्षेत्रावर पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला.