कुंभी कासारीवरील शेतकरी संघटनांच्या मेळाव्यात ठराव संमत
प्रतिनिधी / वाकरे
आगामी गळीत हंगामातील उसाला प्रतिटन ४५०० रुपये एकरकमी दर द्यावा, अन्यथा उसाचे कांडे तोडू देणार नाही. असा ठराव शेतकरी संघटनांच्या मेळाव्यात करण्यात आला. कुडित्रे (ता. करवीर) येथील शेतकरी सांस्कृतिक भवनात शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना, अंकुश आंदोलन संघटना या संघटनांच्यावतीने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात हा ठराव करण्यात आला. अध्यक्षस्थानी दादू कामिरे होते.
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पी. जी. पाटील(वाकरेकर) यांनी सध्या खते, वीज, बी-बियाणे, मशागत, मजुरी आणि डिझेलचे दर वाढल्याने शेती तोट्यात गेल्याचे सांगून उत्पादन खर्चावर आधारित दर मिळण्यासाठी आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. सध्याच्या महागाईच्या परिस्थितीमध्ये उसाला प्रतिटन ४५०० रुपये दर द्यावा, असा ठराव त्यांनी मांडला, तो एकमताने संमत करण्यात आला. तसेच गेले १० महिने हरियाणा, दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करून लखीमपुर येथे ८ शेतकरी मंत्र्यांच्या मुलाकडून चिरडले गेले. त्याचा निषेध व्यक्त केला.
बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बी. जी. पाटील (शिरोळ) यांनी उत्पादन खर्चावर आधारित आणि महागाई निर्देशांक विचारात घेऊन ऊसाला ४५०० रुपये दर मिळणे गरजेचे असल्याचे सांगून कृषी मूल्य आयोग याची दखल घेत नसल्याबद्दल निषेध व्यक्त केला. ऊसाला ठराव केलेला दर मिळण्यासाठी आंदोलन करूया, असे आवाहन त्यांनी केले.
अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चूडमुंगे यांनी उसाची एफआरपी १४ दिवसाच्या देण्यास उशीर झाला, तर सदरची रक्कम व्याजासह द्यावी असा न्यायालयातून आदेश आणल्याचे सांगून काही कारखाने या आदेशाची अंमलबजावणी करीत नाहीत, त्यासाठी पुन्हा न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिला. तसेच शेतकऱ्यांनी उसाची नोंद करताना एफआरपीचे तुकडे करण्याची संमती पत्रे लिहून देऊ नयेत, असे आवाहन केले.
बदाम शेलार यांनी पुढील वर्षापासून घटस्थापनेदिवशी कुंभी कासारीवर भव्य शेतकरी मेळावा घेऊन एफआरपीबाबत एल्गार करण्याची घोषणा केली. युवराज पाटील (यवलुज) यांनी केंद्र सरकारचे शेतकऱ्यांना दाबायचे धोरण असल्याचे सांगून ८ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, तरी महाराष्ट्रातील शेतकरी, मंत्र्यांनी विरोध केला नसल्याबद्दल दुःख व्यक्त केले.
मेळाव्याचे अध्यक्ष दादू कामीरे यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांवर कडाडून टीका करून ऊस दरासाठी शेतकरी संघटना पाहिजे, मात्र शेतकरी आंदोलनात येत नाही याबद्दल संताप व्यक्त केला. यावर्षी पुराने ऊस पिकाचे नुकसान झाले, जगायचे कसे हा शेतकऱ्यासमोर प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आनंदा पाटील (खाटांगळे) यांनी मनोगत व्यक्त केले. संघटनेच्या विविध ठरावांवर दिवसभराच्या या मेळाव्यात सखोल चर्चा करण्यात आली. सभेला सरपंच ज्योत्स्ना पाटील, के. एम. किरूळकर, नारायण मोरे (वडणगे), तानाजी शेलार, गुणाजी शेलार यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. या मेळाव्यात अनेक ठराव संमत करण्यात आले.