ऑनलाईन टीम / पुणे :
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी राज्यातील प्रत्येक आमदारांच्या आमदार निधीतून एक कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, संबंधित आमदारांना आपापल्या मतदारसंघात हा निधी खर्च करता येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
पुण्यातील विधान भवन येथे पार पडलेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर उपमुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी नागरिकांनी निर्बंध पाळून प्रशासनास सहकार्य करावे, अन्यथा मागील वेळप्रमाणे कडक लॉकडाऊन जाहीर करावा लागेल, असा इशारा देखील दिला आहे.
अजित पवार म्हणाले, मागील लॉकडाऊनमध्ये नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला, त्यावेळी ती पहिली लाट होती. मात्र ही दुसरी लाट असून रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे या लॉकडाऊनमध्ये देखील नागरिकांनी चांगली साथ दिली आहे. मात्र काल मंत्रिमंडळाच्या काही सहकारी म्हणाले की, नागरिकांनी जर योग्य प्रतिसाद दिला नाही. तर नाइलाजास्तव मागील लॉकडाऊन सारखी वेळ आणावी लागेल. तशी वेळ येऊ देऊ नये अशी आमची नागरिकांना विनंती आहे.
- … त्यांच्या मागण्या समजून त्यातून मार्ग काढू
पुढे ते म्हणाले, जगावर आजाराचे संकट आले आहे. त्यामुळे ससून येथील डॉक्टरनी संप पुकारू नये. त्यांच्या मागण्या समजून घेऊ आणि त्यातून मार्ग काढला जाईल. मात्र त्यांनी टोकाची भूमिका घेतली, तर सरकारला देखील काही नाईलाजास्तव निर्णय घ्यावा लागेल. तशी वेळ डॉक्टर मंडळीनी येऊ देऊ नये. असा इशारा देखील यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
आरोग्य यंत्रणा कोलमडून पडलेली नाही. उगाच यंत्रणेला ना उमेद करू नका. ती यंत्रणा वर्ष झाले जिवाच रान करत आहे. प्रत्येक पेशंटला रेमडेसिवीर देण्याची गरज नाही. असे तज्ज्ञ सांगतात. पण डॅाक्टर रेमडेसिवीर आणा असे सांगतात. मग पेशंट खासदार आमदारांना फोन करायला लागतात, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.