बेळगाव / प्रतिनिधी :
कन्नड संघटनांकडून सध्या कोल्हेकुई सुरू झाली आहे. एका संघटनेने तर बेळगाव विमानतळावर महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेशबंदी करा, अशी मागणी केली आहे. राजकीय नेत्यांना पक्षीय कामाकरिता अन्य राज्यांमध्ये जावे लागते. त्यामुळे अशी वक्तव्ये तात्काळ थांबवा. अन्यथा एकाही कन्नड नेत्याला मुंबई विमानतळावर पाय ठेवू देणार नाही, असा इशारा कोल्हापूरचे नवनिर्वाचित मंत्री हसन मुश्रिफ यांनी दिला आहे.
एका खासगी कार्यक्रमासाठी ते बुधवारी बेळगावमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी तरुण भारतशी संवाद साधला. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच ते बेळगावमध्ये आले होते. सीमाभागातील मराठी भाषिक मागील 63 वर्षांपासून अन्याय सहन करीत आहेत. आम्ही या सीमालढय़ामध्ये पूर्वीपासून सहभागी होत आहोत. त्यामुळे या लढय़ाचे गांभिर्य आम्हाला माहिती आहे. मागील काही दिवसांपासून मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा कुरापती कन्नड संघटनांनी बंद कराव्यात, असे त्यांनी सांगितले.
बेताल वक्तव्यांना आळा घाला
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा हे सज्ञान आहेत. त्यांना राज्य चालविण्याचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे गोळय़ा घालणे वगैरे बरळणाऱया माथेफिरूला आवरावे. अन्यथा, त्याचे परिणाम वाईट होतील, असा सूचक इशाराच त्यांनी कर्नाटकाला दिला आहे.