पुणे / प्रतिनिधी :
बाबरी मशिदीसारखा जटील प्रश्न सामंजस्याने सुटू शकतो, तर कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद का सुटू शकत नाही. कर्नाटकच्या सीमा या पाकिस्तानच्या सीमा नसून, भारतातीलच एका राज्याच्या सीमा आहेत. परंतु, त्या सीमेवर नव्या हिटलरशाहीचा उगम होतो आहे, की काय अशी शंका यावी, असे वातावरण आहे. सामोपचाराने हा प्रश्न कायमचा मिटवावा अन्यथा कर्नाटक केंद्रशासित राज्य म्हणून घोषित करावे, असे मत ज्येष्ठ समीक्षक, विचारवंत आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
आडकर फौंडेशनतर्फे ज्येष्ठ समीक्षक, विचारवंत आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांचा जाहीर सत्कार आज करण्यात आला, त्यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. सबनीस बोलत होते. यावेळी डॉ.श्रीपाल सबनीस यांचे यांचे सांस्कृतिक एकता आणि समाज राजकीय शुद्धीकरण या विषयावर व्याख्यान झाले.
यावेळी व्यासपीठावर डॉ.डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी.डी. पाटील, माजी गृहमंत्री रमेश बागवे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सबनीस म्हणाले, माणसाचा गहिवर हे माझ्यासाठी अंतिम सत्य आहे. मी स्वतःला कधीही कोणाएका पक्षाच्या, जातीच्या, धर्माच्या चौकटीत बंदिस्त करून घेतले नाही. माझ्या सद्विवेवक बुद्धीला जी बाजू पटली त्यानुसार मी माझी भूमिका घेत गेलो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माझ्या नावाची घोषणा होताच, हे कोण श्रीपाल सबनीस असे प्रश्न उपस्थित केले गेले. अनेक पातळय़ांवर मला रोषाला, संघर्षाला आणि दबावाला सामोरे जावे लागले. परंतु, महाराष्ट्राला लाभलेल्या वैचारिक अधिष्ठानामुळे कालांतराने माझी वैचारिक भूमिका मला विरोध करणाऱयांपासून सगळय़ांनीच स्वीकरली. संतांच्या प्रवाहापासून तर आदिवासींच्या प्रवाहापर्यंत वेळोवेळी सगळय़ांनीच माझ्या भूमिकेला पाठिंबा दिला. महाराष्ट्राने माझ्यावर भरभरून प्रेम केले, मी त्यांच्या कृतज्ञतेत राहू इच्छितो.