रेल्वेगेट पडल्यामुळे राजूला तीन दिवस मिळाले होते जीवदान : दोड्डबोम्मण्णावर खूनप्रकरणी अनेक धक्कादायक बाबींचा उलगडा
प्रतिनिधी /बेळगाव
रिअल इस्टेट व्यावसायिक राजू दोड्डबोम्मण्णावर (वय 41) या युवकाच्या खूनप्रकरणी अनेक धक्कादायक बाबींचा उलगडा झाला आहे. मंगळवार दि. 15 मार्च रोजी त्याचा खून झाला. त्या दिवसापासून ठिक तीन दिवस आधी त्याचा खून करण्याचा प्रयत्न झाला होता. रेल्वेगेट पडल्यामुळे त्याला तीन दिवस जीवदान मिळाले.
सुपारी घेऊन मुडदे पाडणाऱया सराईत गुन्हेगारांचे कारनामेही या खूनप्रकरणाच्या तपासादरम्यान उघडकीस आले आहेत. आर्थिक व्यवहार, व्यावसायिक कारणामुळे राजूचा खून झाला आहे. त्याच्या खुनाची सुपारी त्याच्याच दोघा मित्रांनी सराईत गुन्हेगारांना दिली. त्याच्या पत्नीनेही त्यांच्याशी हातमिळवणी केल्याचे पोलीस तपासात सामोरे आले आहे. सोमवारी तिघा जणांना अटक झाली आहे.
शशिकांत शंकरगौडा याने राजूच्या खुनासाठी कपिलेश्वर मंदिरामागील संजय रजपूतला सुपारी दिल्याचे उघडकीस आले आहे. संजय सध्या फरारी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. धरणेंद्र घंटी, शशिकांत व राजूची पत्नी किरण या तिघांनी खुनाचा कट रचल्यानंतर शशिकांतने संजय रजपूतची भेट घेतली. दहा लाखाला खुनाचा सौदा ठरला. संजयने विजय जागृत याला हे काम सोपविले. विजय जागृतने विशाल चव्हाणवर खुनाची जबाबदारी सोपविली. त्या बदल्यात विशालला पाच लाख रुपये द्यायचे ठरले.
रविवार शेवटचा दिवस ठरला असता
रविवार दि. 13 मार्च रोजी रात्री महात्मा फुले रोडवरील एका हॉटेलमध्ये खून झालेला राजू, धरणेंद्र व शशिकांत यांची पार्टी झाली. पार्टीनंतर राजूला घरी पाठविण्यात आले. लगेच संजय रजपूतला ही माहिती देऊन राजू आपल्या कारमधून घरी निघाला. त्याला संपविण्यासाठी हीच वेळ योग्य आहे, काम उरकून घ्या, असा निरोप मारेकऱयांना दिला. संजय रजपूत व त्याच्या साथीदारांनी कारमधून राजूचा पाठलाग केला. जर राजू सापडला असता तर त्याच्या आयुष्यातील रविवार हा शेवटचा दिवस ठरला असता.
खुनासाठी भाडोत्री कारचा वापर
पहिल्या रेल्वेगेटपर्यंत गेल्यानंतर राजूने गेट ओलांडले. त्याचवेळी रेल्वेगेट पडले. त्याच्या मागावर असलेले मात्र त्यामुळे गेटच्या दुसऱया बाजूला अडकून पडले. त्यामुळे त्या दिवशी राजू बचावला. त्यानंतर मंगळवारचा दिवस ठरविण्यात आला. मंगळवारी संजय रजपूत, विजय जागृत, विशाल चव्हाण आदींनी खुनासाठी एक कार भाडोत्री घेतली. सोमवारी रात्रीच कारचालक सूरजला आपल्याजवळ बोलावून घेतले. मंगळवारी पहाटे पाच वाजता हे सर्वजण कारमधून राजूच्या प्रतीक्षेसाठी निघाले. याचवेळी शास्त्राrनगर परिसरातील सर्वेश व आणखी दोघेजण मोटारसायकलवरून भवानीनगर परिसरात पोहोचले.
पहाटे 5.45 वाजण्याच्या सुमारास वॉकिंगला जाण्यासाठी राजू कारमधून बाहेर पडला. विशाल चव्हाणने ही गोष्ट पाहिली. मोटारसायकलवरून गेलेल्या सर्वेशला याची माहिती देण्यात आली. सर्वेश व त्याच्या दोन साथीदारांनी कारला मोटारसायकल आदळून कार अडविली. यावेळी राग अनावर झालेल्या राजूने कारमधूनच या तिघा जणांपैकी एकाच्या श्रीमुखात भडकाविली. यावेळी भांडणही काढण्यात आले. भांडणावेळी कारचा दरवाजा उघडून राजू खाली उतरला. त्यावेळी त्याच्या डोळय़ात मिरचीपूड टाकण्यात आली. त्यानंतर चाकूने त्याच्यावर वार करण्यात
आले.
गुन्हेगारांना अटक झाल्यानंतर आणखी माहिती बाहेर पडणार
संजय रजपूत, विशाल चव्हाण, सर्वेश सपकाळ, विजय जागृत, सूरजसह आणखी काहीजण अद्याप फरारी आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. राजूच्या खुनासाठी दहा लाख रुपये कोणी खर्च केले? कोणाला किती वाटा मिळाला? याचा तपास करण्यात येत आहे. केवळ काही सराईत गुन्हेगारांना पोलीस अधिकाऱयांसमोर हजर करायचे आणि कटात सहभागी असलेल्या उर्वरित आरोपींना वाचविण्याचाही प्रयत्न झाला. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची पाळेमुळे खणली असून सुपारी घेणाऱया गुन्हेगारांना अटक झाल्यानंतर आणखी माहिती बाहेर पडणार आहे.