प्रतिनिधी/ चिपळूण
जिल्हाधिकाऱयांनी जाहीर केलेले 144 कलम तत्काळ मागे घ्या. इतर विभागांना मिळालेल्या परवानगीनुसार कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रमांनाही परवानगी द्यावी अन्यथा नवरात्रोत्सवात स्वत:हूनच कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम सुरू करण्याचा इशारा महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे कोकण अध्यक्ष भगवान कोकरे यांनी दिला आहे. आपल्या मागणीचे निवेदन त्यांनी गुरूवारी प्रांताधिकारी प्रवीण पवार यांना दिले आहे.
या बाबत कोकरे म्हणाले की, कोरोनामुळे सुरूवातीच्या काळात वारकऱयांनी शांत बसणे पसंत केले. मात्र आता अनेक बाबींना शिथिलता देण्यात आली आहे. दारूची दुकाने, हॉटेल, मच्छी, मटण मार्केट, बाजारपेठ सुरू झाल्या असताना असताना शासन धार्मिक कार्यक्रम मात्र करू नका, गर्दी होईल, कोरोनाचा संसर्ग वाढेल, असा शोध लावत आहे. नवरात्रोत्सव जवळ आला असताना जिल्हाधिकाऱयांनी 144 कलम जारी करत 5 हून अधिक व्यक्तींना एकत्र येण्यावर बंदी घातली आहे. याला आमचा विरोध असून आता बंदी घालण्याऐवजी सर्वच परिस्थिती पूर्वपदावर कशी आणता येईल, यासाठी शासन व प्रशासनाने प्रयत्न करण्याची गरज आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी औषधांबरोबर मानसिक आधाराची गरज आहे. हे समाधान देवळात जाऊन, किर्तनातूनच मिळू शकते. त्यामुळे मंदिरे खुली करण्याची गरज असून कीर्तन, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांना परवानगी द्यावी, यासाठी 10 दिवसांचा अवधी देत आहोत. तरीही विचार न झाल्यास मंदिरे खुली करून सर्व कार्यक्रम पार पाडू. यावेळी नियमांचे उल्लंघन झाले तर आमच्यावरही गुन्हे दाखल करा ते आम्ही स्वीकारू, असे त्यांनी सांगितले. यावेळी महामंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष अभय सहस्त्रबुध्दे, खेडचे अध्यक्ष शैलेश आंब्रे, मार्गदर्शक दत्ताराम आयरे, अरविंद चव्हाण आदी उपस्थित होते.