हरिजनवाडी मुळगाव येथील मते एकाच प्रभागात ठेवण्याची मागणी : प्रभाग फेररचनेत विभागणी केल्याने मतदार संतप्त : आमचा प्रभाग राखीव करा
प्रतिनिधी /डिचोली
मुळगाव पंचायतीच्या प्रभाग क्र. 3मध्ये येणाऱया हरिजनवाडय़ावरील 115 पैकी 88 मते प्रभाग फेररचनेत प्रभाग क्र. 4मध्ये समाविष्ट करण्यात आल्याने या वाडय़ावरील लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आमच्या समाजाच्या एकत्रित मतदार संख्येमुळे या प्रभागाला आरक्षण मिळणार व आमच्या समाजाचा उमेदवार निवडून येणार या भीतीपोटी हे कारस्थान रचण्यात आले आहे. डिचोली मामलेदार आणि संबंधितांनी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून ही सर्व मते एकाच प्रभाग क्र. 3 मध्ये आणावी. अन्यथा आम्ही पंचायत निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालू, असा इशारा या वाडय़ावरील लोकांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे.
मुळगाव पंचायत क्षेत्रात आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग क्र. 3 मध्येच मतदान करीत आहेत. याचवेळी पंचायत प्रभाग फेररचनेत या प्रभागातील मतांची विभागणी करण्यात आली आहे. त्यासाठी विशेषतः आमच्या हरिजनवाडय़ावरील मतांची मोठी विभागणी केली आहे. 115 पैकी थेट 88 मतांचा समावेश प्रभाग क्र. 4 मध्ये करण्यात आलेला आहे. या विषयी मामलेदारांना विचारले असता त्यांनी सदर प्रक्रिया योग्य असल्याचे सांगितले. परंतु ही प्रभाग फेररचनेची प्रक्रिया करताना भौगोलिक दृष्टय़ा अभ्यास केला गेलेला नाही. कार्यालयात बसून प्रभाग फेररचना करण्यात आली आहे, असे रामचंद्र परवार यांनी सांगितले.
प्रभाग 4 मधील मतदान केंद्र हे पलतडीला आहे. ते आमच्या वाडय़ापासून दूर असून वृध्द मतदारांना तेथे येण्याजाण्यासाठी समस्या निर्माण होणार आहे. याचा विचार सरकारी पातळीवरून केला गेलेला नाही. आता सदर भागात रस्ता झाल्याने सोय होणार. मात्र सदर रस्ता नसता तर ही मते कुठे घातली जाणार होती ? असा सवाल रामचंद्र परवार यांनी केला असून ही फेररचना रद्द करून हरिजनवाडय़ावरील सर्व मतदारांना पूर्वीप्रमाणेच एकत्रित आणावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
भीतीपोटी कारस्थान!
हरिजनवाडा मुळगाव येथील 115 मते एकत्रित राहिल्यास कायद्याप्रमाणे सदर प्रभाग आरक्षित करण्याचे बंधन आहे. याच भितीपोटी हे कारस्थान रचून 88 मते वेगळी करण्यात आली आहेत. कारण गेल्या पंचायत निवडणुकीत एससी/एसटी राखीव नसताना महिला राखीव प्रभागात आमच्या एका महिला उमेदवाराचा केवळ 5 मतांच्या फरकाने पराभव झाला होता. यावेळी जर सदर प्रभाग राखीव झाला. किंवा एकत्रित सर्व मते राहिल्यास आमचा उमेदवार बाजी मारण्याची भीती असल्याने हे कारस्थान रचण्यात आले आहे. ही फेररचना रद्द करून सर्व मते जर प्रभाग क्र. 3 मध्ये आणली गेली नाही तर आम्ही या निवडणुकीवर बहिष्कार घालणार आहोत. असा इशारा यावेळी बाबी परवार यांनी दिला.
प्रभाग राखीव करण्याची मागणी
डिचोली मतदारसंघातील अडवलपाल गावात 70 मते असलेल्या प्रभागाला आरक्षण दिले जाते आणि हरिजनवाडा मुळगाव येथे हरिजनांची 115 मते असून या प्रभागाला आरक्षण दिले जात नाही. घटनेत आम्हालाही आरक्षणाचा अधिकार दिला असून हा प्रभाग आरक्षित करावा. या वाडय़ावरील विभागणी करण्यात आलेली सर्व मते पूर्ववत प्रभाग क्र. 3 मध्ये आणावी, अशी मागणी शिवराम हरिजन यांनी केली आहे.
आताच मतांची विभागणी करण्याचे कारण काय ?
गेल्या अनेक वर्षांपासून या वाडय़ावरील लोक एकाच प्रभागात मतदान करीत आले आहेत. आमच्या जुन्या जाणत्यांनीही याच प्रभागातून मतदान केले आहे. परंतु याचवेळी हा प्रभाग फोडून मतांची विभागणी करण्याचे कारण काय? आमचा समाज एकत्रित आहे. व मतदानही आतापर्यंत एकत्रितपणेच करीत आलेला आहे. अशा परिस्थितीत बदल कोणत्या भितीने केला आहे ? असा सवाल शांती परवार यांनी उपस्थित केला.
हरिजनवाडा मुळगाव येथेच घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेला या वाडय़ावरील मोठय़ा संख्येने लोकांची उपस्थिती होती. पूर्वीप्रमाणेच सर्व मते एकत्रितपणे एकाच प्रभागात आणण्याची जोरदार मागणी यावेळी या लोकांनी केली. अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला.