प्रतिनिधी / सातारा :
महापूर येण्याला धरण परिसरातली वृक्षतोड जबाबदार आहे. ही चोरटी वृक्षतोड थांबवली गेली नाही तर क्रांतिच्या सातारा जिल्ह्यातूनच मंत्र्यांच्या घरावर शेतकरी संघटनेच्यावतीने दगडफेक करून आंदोलनाला सुरुवात केली जाईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिला आहे. दरम्यान, एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांवर मुख्यमंत्री कारवाई का करत नाहीत. कारखानदारांचेच हे मंत्रीमंडळ आहे, असाही त्यांनी आरोप केला.
साताऱ्यात शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शेतकरी संघटनेचे विकास आढाव, राजेंद्र बर्गे यांच्यासह जिह्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना रघुनाथदादा पाटील म्हणाले, सध्या पश्चिम महाराष्ट्रावर जे महापूराचे संकट आले आहे. त्याला धरण परिसरात होणारी चोरटी वृक्षतोड जबाबदार आहे. धरण परिसरात लाकूड तोडीचा व्यवसायच सुरु झालेला आहे. त्यामुळे भूस्खलन मोठया प्रमाणावर होत आहे. ही वृक्षतोड थांबली गेली नाही तर शेतकरी लाकूड वाहतूक करणाऱ्या गाडय़ा फोडतील. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पश्चिम महाराष्ट्रात फिरु दिले जाणार नाही. मंत्र्यांच्या घरावर दगडफेक करू असा इशारा देत या आंदोलनाची सुरुवात क्रांतिच्या सातारा जिल्ह्यातून होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
कर्जमाफी न झाल्यास 12 ऑगस्टला आंदोलन
कर्जमाफी म्हणजे जत्रेत उधळणाऱ्या खोबऱ्यासारखे झाले आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढवला जातो. मग खैरात सर्वांना वाटत असताना शेतकऱ्यांना वाऱ्यावर का सोडलं जातं असा सवाल उपस्थित करत जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना सीसीच्या नावाने कर्ज देवून फसवणूक केली आहे. कर्जमाफी केली नाही तर दि. 12 रोजी डीडीआर कार्यालयास टाळे ठोकू, असा इशारा त्यांनी आहे.