भाजप सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अविनाश पराडकर यांचा इशारा
प्रतिनिधी / मालवण:
वाढत्या थकबाकीमुळे सिंधुदुर्गात महावितरण अडचणी आले असून जनतेने तात्काळ बिले भरावी अन्यथा कारवाई करू, अशी धमकी महावितरणच्या मुख्य अभियंत्याने जनतेला दिली आहे. लॉकडाऊन, वादळ यात जिल्हय़ातील जनतेचे कंबरडे मोडले आहे. वीजवितरण अडचणीत असेल, तर सरकारकडून पॅकेज मागून घ्यावे. तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी सामान्य जनतेवर कारवाई केलात, तर महागात पडेल. सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढणाऱया भाजप कार्यकर्त्यांवर यापूर्वीच सरकारने विविध कलमांखाली गुन्हे नोंदविले आहे. त्यामुळे वीज प्रश्नावर महावितरण मुजोरखोरी करणार असेल तर यापुढे त्याच पद्धतीने प्रतिउत्तर मिळेल याची नोंद घ्यावी, असे भाजप सोशल मीडियाचे अविनाश पराडकर यांनी म्हटले आहे.
लॉकडाऊन उठण्याची चिन्हे दिसताच महावितरणने आपल्या वसुलीसाठी फणा काढायला सुरुवात केली असल्याचे दिसते. सर्वसामान्य जनता आणि हतबल झालेले उद्योगपती यांनी जगायचे कसे हे शासनाने स्पष्ट करावे. लॉकडाऊन उठले याचा अर्थ असा नव्हे, की या वर्गाकडे पैशाची आवक सुरू झाली. जिल्हय़ातील उद्योगधंदे पूर्ववत होण्यासाठी अजून किती महिने जातील हे कोणीच सांगू शकत नाहीत. अशा परिस्थितीत महावितरण त्या वर्गाला चेपण्याचा प्रयत्न करत असेल, तर भारतीय जनता पार्टीतर्फे व्यापक जनआंदोलन उभारावे लागणार आहे. यातून होणाऱया परिणामांची जबाबदारी ही शासनाची राहणार आहे, असेही पराडकर यांनी म्हटले आहे.