महावितरण, जिल्हाधिकाऱ्यांना सकल मराठा समाजातर्फे निवेदन
प्रतिनिधी / कोल्हापूर
महावितरणमध्ये नोकर भरतीत निवड झालेल्या मराठा समाजातील उमेदवारांना डावलून नियुक्ती देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ती तात्काळ थांबवण्यात येवून एसईबीसी प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदारांना नियुक्तीपत्रे देण्यात यावीत अशी मागणी सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आली आहे. अन्यथा राज्यभर आंदोलन पेटण्याची वाट पाहू नका, भडका उडेल. असा इशाराही निवेदनातून दिला आहे. निवासी जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना हे निवेदन दिले.
9 सप्टेंबर रोजी मराठा आरक्षण स्थगिती देताना सुप्रीम कोर्टाने भरती संदर्भात पूर्वलक्षी स्थगिती दिलेली नाही. महावितरण सरळसेवा नोकरभरती मध्ये सन2019-20 मध्ये एसईबीसीमधून निवड झालेल्या उमेदवारांची कागद पडताळणी फेब्रुवारी 2020 मध्येच पूर्ण झालेली असून 45 दिवसात नियुक्ती मिळणे आवश्यक होते. कोरोनामुळे राज्य शासनाने सर्व प्रकारच्या नियुक्त्या थांबवल्या होत्या. वरील वस्तुस्थिती पहाता भरती नियुक्ती देण्यास कोरोना महामारीमुळे विलंब झाला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांना ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी महावितरण नियुक्तीमध्ये मराठा उमेदवारांवर अन्याय होणार नाही त्यांनाही नियुक्ती देणार असा शब्द दिला होता. राज्य शासनाने आपल्या अधिकाराचा वापर करून आरक्षण स्थगितीपूर्व निवड झालेल्या एसईबीसी उमेदवारांना न डावलता विनाविलंब नियुक्ती देवून मराठा युवापिढीचे खच्चीकरण थांबवावे अशी मागणी निवेदनात केली आहे. अन्यथा राज्यभर आंदोलन सुरू केले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी सकल मराठा समाजाचे वसंतराव मुळीक, ऍड. गुलाबराव घोरपडे, दिलीप देसाई, हर्षल सुर्वे, अजित तांबेकर, संतोष घाडगे, अनिल पाटील, अक्षय तोडकर, अभिजित तोरस्कर, योगेश साळोखे, साईराज सावंत, संग्रामसिंह घोरपडे, सूरज मुळीक, सूरज सुर्वे यांचे सह निवड झालेले उमेदवार व पालक उपस्थित होते.