मास्क वापरा, अन्यथा दंड वसुलीचा बडगा उगारला जाणार
प्रतिनिधी / बेळगाव
विनामास्क फिरणाऱयांवर मनपाकडून कारवाई करण्यात येत आहे. मात्र, दंड देण्यास पैसे नसल्याचे सांगून दंड भरण्याचे टाळत आहेत. पण आता पैसे नसल्याची सबब खपवून घेतली जाणार नाही. दंड न भरणाऱया नागरिकांच्या वाहनाचा क्रमांक घेऊन रहदारी खात्यामार्फत दंड वसूल केला जाणार आहे. त्यामुळे मास्क घातल्याशिवाय पर्याय नाही.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे. शहरात कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने नागरिक विनामास्क फिरत आहेत. मात्र, सध्या महाराष्ट्र व केरळ राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे राज्याच्या सीमा सीलबंद करून कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. शहरात फिरणाऱया नागरिकांसह व्यावसायिकांना मास्क परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याकरिता महापालिकेकडून जागृती मोहीम राबविण्यात आली होती. आता दंडात्मक कारवाईस प्रारंभ करण्यात आला आहे.
विनामास्क फिरणाऱया नागरिकांकडून 200 रुपये दंड आकारणी करण्यात येत आहे. मात्र, दंडाची रक्कम भरण्यासाठी पैसे नसल्याचे सांगून काही नागरिक दंड न देताच जात आहेत. दंडाची रक्कम भरण्यासाठी सक्ती करण्यात आल्यास वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत. दंडाची रक्कम नसल्याचे सांगून जाणाऱया वाहनधारकांच्या वाहनाचा क्रमांक घेऊन रहदारी खात्यामार्फत दंड वसूल करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. तशी तरतूद कोविड नियमावलीत करण्यात आली आहे.
दंड भरण्याचे टाळण्यासाठी काही नागरिक पैसे नसल्याचे कारण देत असतात. पण कोणतीच सबब ऐकून न घेता दंड वसुलीसाठी महापालिका रहदारी खात्याची मदत घेणार आहे. दंडाची रक्कम नसल्याचे सांगणाऱया नागरिकांच्या वाहनांचा क्रमांक घेऊन तो रहदारी खात्याकडे पाठवून दंडाची रक्कम वसूल करण्याची सूचना करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना दंड भरणे अनिवार्य आहे. दंडाची रक्कम नसल्यास रहदारी पोलीस खात्याची नोटीस घरी येण्याची शक्मयता आहे. त्यामुळे मास्क वापरा, अन्यथा दंड भरा, असा बडगा उगारला जाणार आहे.
विनामास्क दंडात्मक कारवाई काटेकोरपणे राबवा
कोरोना विषाणूंचा प्रसार वाढण्याची धास्ती निर्माण झाल्याने महापालिका प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेण्यास प्रारंभ केला आहे. मास्क घालण्याबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात आली. मात्र, आता दंडात्मक कारवाई करण्यासाठी मनपा आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांना सूचना करण्यात आली. त्यामुळे विनामास्क कारवाई काटेकोरपणे राबविण्यात येणार आहे.
शेजारील राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र असल्यासच प्रवेश देण्यात येत आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरिता आवश्यक उपाय योजण्यास आतापासूनच प्रारंभ करण्यात आला आहे. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा प्रसार वाढला होता. त्यामुळे खबरदारी घेणे आवश्यक असल्याने मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे आदींसह स्वच्छतेचे काम व्यवस्थित करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱयांची बैठक बुधवारी आयोजित करण्यात आली होती.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मास्क वापरणे आणि सामाजिक अंतर राखणे आदी बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत नागरिकांना सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र, नागरिकांनी कोरोना नियमावलीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे जनजागृती करण्यात आली आहे.
मास्क वापरण्याची सक्ती करण्यासाठी दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ही कारवाई करण्याची सूचना स्वच्छता निरीक्षक आणि सुपरवायझरना करण्यात आली. स्वच्छता कामगारांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. ती घेण्यासाठी स्वच्छता कामगारांना मार्गदर्शन करण्याची सूचना करण्यात आली.
यावेळी महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ आणि पर्यावरण साहाय्यक कार्यकारी अभियंते एच. व्ही. कलादगी यांनी स्वच्छता निरीक्षकांना मार्गदर्शन केले.