स्वाभिमानी संघटनेचे राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा, एमपीएससीमध्ये उत्तीण विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर शेट्टी आक्रमक
प्रतिनिधी / कोल्हापूर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ( एमपीएससी ) परिक्षेत उत्तीर्ण होऊनही वेळेत मुलाखत प्रक्रिया पार पडली नसल्याच्या तणावातून आणि आर्थिक विवंचनेतून स्वप्नील लोणकर या विद्याथ्यनि गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना फुरसुंगी जवळील गंगानगर येथे घडली. या घटनेबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज्यसरकावर रविवारी टिकास्त्र सोडले.
एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील राज्यसरकारकडून मुलाखतीसाठी विलंब झाल्यामुळे लोणकर या विद्यार्थ्यांने आपली जीवनयात्रा संपवली. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणावरून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. राजकीय वर्तुळातून यावर तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत.
महाविकास आघाडी सरकारने आतातरी डोळे उघडून त्यांच्या प्रश्नांकडे डोळसपणे बघून त्यांना विश्वासात घेऊन त्यांचे प्रश्न सोडवावेत , अन्यथा हेच तरूण एक दिवस तुमच्या गळ्याला फास लावल्याशिवाय सोडणार नाहीत. असा इशारा शेट्टी यांनी ट्विटद्वारे दिला आहे. स्वप्नील लोणकर या तरुणाने एमपीएससीकडून वेळेत मुलाखत न झाल्याने आत्महत्त्या केली. प्रिलियम व मेन्स क्लिअर केलेल्या स्वप्नीलचा मुलाखतीसाठी होणाऱया विलंबाने मात्र धीर खचला, त्याने जीव दिला. माझी सर्व विद्यार्थ्यांनी विनंती आपण अशी टोकाची भुमिका घेऊ नका, असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.