अरुणा प्रकल्प संघटनेची माहिती
अन्यथा, प्राणांतिक बेमुदत उपोषण!
पंधरा वर्षात प्रथमच प्रकल्पाचे पूर्ण काम थांबले
वार्ताहर / वैभववाडी:
तालुक्मयातील अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनानंतर धरणाच्या पिचिंगचे आणि कालव्याची कामे गेल्या दोन दिवसांपासून पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहेत. सुमारे 15 वर्षानंतर प्रकल्पस्थळी कामे पूर्णपणे बंद झाली आहेत. प्रकल्पाला आमचा कोणताही विरोध नाही. परंतु प्रकल्पग्रस्तांच्या असहाय्यतेचा, अज्ञानाचा फायदा उठवून प्रकल्प अधिकाऱयांनी आखवणे, नागपवाडी, भोम गावातील प्रकल्पग्रस्तांवर केलेल्या अन्यायाची तक्रार दिल्ली येथे प्रधानमंत्री सिंचाई योजनेच्या मुख्य अधिकाऱयांकडे प्रत्यक्ष भेटून करणार आहोत, असे ‘लढा संघर्षाचा, अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा’ या संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे यांनी सांगितले.
अरुणा प्रकल्पाच्या पाण्याचा विसर्ग गेल्या महिन्याभरापासून मोठय़ा प्रमाणात सुरू ठेवण्यात आला होता. त्यामुळे अरुणा धरणात बुडालेली घरे दिसू लागताच पाण्याचा विसर्ग अचानक पूर्णपणे बंद करण्यात आला. मात्र, धरणाची विविध कामे सुरू होती. याविरोधात प्रकल्पग्रस्तांनी आक्रमक होत पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची मागणी केली. जोपर्यंत धरणात बुडालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या घरांचा पंचनामा करून प्रकल्पग्रस्तांना योग्य नुकसानभरपाई मिळत नाही, तोपर्यंत धरणाचे उर्वरित काम सुरू करू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेत धरणाच्या पिचिंगचे व कालव्याचे काम प्रकल्पग्रस्तांनी बंद पाडले. गेले दोन दिवस धरणाचे काम पूर्णपणे बंद आहे.
…तर प्राणांतिक आमरण उपोषण
कार्यकारी अभियंता आणि अधीक्षक अभियंत्यांनी अरुणा प्रकल्पात केलेल्या पापाचे प्रकरण अंगलट येणार हे लक्षात आल्याने त्यांनी बदली करून पळ काढला आहे. जबाबदार अधिकारी उपलब्ध नसल्याने आम्ही दाद कुणाकडे मागायची? महालक्ष्मी इन्फ्रा प्रोजेक्टस्शिवाय आता पर्याय नसल्याने अरुणा प्रकल्पग्रस्त पुणे येथील ठेकेदाराच्या कार्यालयावर थेट आक्रोश आंदोलन, बेमुदत उपोषण करणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले. यावेळी प्रकाश सावंत, सेपेटरी अजय नागप, विलास कदम, पांडुरंग जाधव, मुकेश कदम, जयराम कदम, राजा कांबळे आदी उपस्थित होते.