वृत्तसंस्था/नवी दिल्ली
आत्मनिर्भर पॅकेजची घोषणा करण्यापूर्वी आम्ही अन्य देशांनी उचललेल्या पावलांची समीक्षा केली आहे. कोरोना संकटापासून अर्थव्यवस्थेला वाचविण्यासाठी या देशांनी कुठली पावले उचलली हे जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याचे उद्गार अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काढले आहेत. दुसऱया देशांच्या निर्णयांचा बारकाईने अभ्यास केल्यावरच आत्मनिर्भर भारत पॅकेज तयार करण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.
अन्य देशांच्या आर्थिक पॅकेजमध्येही फिस्कल स्टिम्युलस, मॉनिटरी स्टिम्युलस, हमी, केंद्रीय मदतनिधी यासारख्या गोष्टी सामील आहेत. आम्ही देखील पॅकेजमध्ये याच बाबींचा समावेश केल्याचे सीतारामन यांनी म्हटले आहे.
तंत्रज्ञानाचा लाभ
तंत्रज्ञानामुळेच थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून कोटय़वधी लोकांना त्वरित मदत पोहोचविण्यात आली. टाळेबंदीनंतर त्वरित पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजची घोषणा करण्यात आली. देशात कुणीच उपाशी राहू नये हा आमचा उद्देश होता. डीबीटीच्या माध्यमातून कोटय़वधी लोकांच्या खात्यात त्वरित पैसे पोहोचविल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे.